• Sat. Jun 7th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करा; ‘लाडकी बहीण’वरुन संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर

ByEditor

Jun 6, 2025

रायगड : एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी निधी जमवताना राज्य सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. तर दुसरीकडे आता सरकारमधील आमदारांनीच या योजनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं. लोकांवर असा कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च करा असा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला. ते रायगडवर माध्यमांशी बोलत होते.

आमदार संजय गायकवाडांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. लाडक्या बहिणींना सव्वा लाख कोटी दिले तसा निधी देऊन शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचंही संवर्धनही करा असं संजय गायकवाड म्हणाले.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या साक्षीदार होण्याकरिता मी या ठिकाणी आलो आहे. शिवरायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहेत. राजेंची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी 350 इमारती असलेला किल्ला कमी कालावधीत उभारला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना जर का दीर्घायुष्य लाभलं असतं तर देशात निजाम मुघल, पोर्तुगीज, कुतुबशाह हे कोणीच शिल्लक राहिले नसते. मराठ्यांनी पराक्रम करून संपूर्ण भारतभूमी 1750 पर्यंत मोघलरहीत केली.

किल्ल्यावर येणाऱ्या तरुणांना आमदार गायकवाड यांनी सल्ला दिला. ते म्हणाले की, “खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. गडकिल्ल्यावर आपल्या प्रेमिकेचे नाव आणि इतर विटंबना करणाऱ्या तरुणांनी तसं करू नये. गडकिल्ल्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती संदर्भात बोलताना गायकवाड म्हणाले की, गडकिल्ल्यांचं पुनर्वैभव प्राप्त होणे गरजेचे आहे. कोट्यवधीच्या योजना लोकांवर उधळण्यापेक्षा तेच पैसे राजांच्या गडकिल्ला संवर्धनासाठी वापरा.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लाखो करोडो महिलांची अब्रू कुंकू वाचवल त्या राजांचे किल्ले कधी तुम्ही सलामत ठेवणार? असा प्रश्न संजय गायकवाड यांनी सरकारला विचारला. शिवरायांचे किल्ले जसे होते त्याच पद्धतीने पुन्हा निर्माण करण्याचा सल्ला आमदार गायकवाड यांनी दिला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काहीच फरक पडणार नाही. कारण आता वेळ निघून गेली आहे असं संजय गायकवाड म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडल्याने मुंबईची जनता त्यांना स्वीकारेल का असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!