रायगड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी, रायगड यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये दि. ९ जून २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २३ जून २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
खालापूर, महाड, रोहा, खोपोली, रसायनी, माणगाव, अलिबाग अशा औद्योगिक भागांमध्ये कामगार आंदोलन व संपाचे प्रकार घडत असून, त्यामुळे अनेकवेळा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यातील काही भागांत हिंदू-मुस्लिम तसेच विविध धर्मीयांची मिश्र वस्ती असल्याने जातीय तणावाचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. दि. ९ जून २०२५ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असून लाखो शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे. दि. १७ व २० जून २०२५ रोजी राजमाता जिजाऊ स्मृतीदिन साजरे होणार आहेत.
या कालावधीत शस्त्र, लाठ्या, तलवारी, सोटे इत्यादी शारिरीक इजा करण्यायोग्य वस्तू बाळगणे, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे. दगडफेक, क्षेपणास्त्रे व त्याची साधने बाळगणे, प्रतिमा, प्रेत, आकृत्यांचे प्रदर्शन करणे.आक्षेपार्ह घोषणा, गाणी, भाषणे वाजविणे वा सादर करणे, राज्यविरोधी भाषणे, चित्र, चिन्हांचा प्रसार करणे. ५ पेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव किंवा मिरवणूक पूर्वपरवानगीशिवाय घेणे यावर बंदी असेल.
या कालावधीत वगळण्यात आलेल्या बाबी, शासकीय अधिकारी, ड्युटीवरी असताना अधिकृत शस्त्र वापरू शकतील. अंत्यविधी, प्रेतयात्रा, किंवा शासकीय समारंभ यासाठी हा आदेश लागू नाही.उत्सव, सभा, मिरवणूक यासाठी तहसीलदार/कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहील. शांतता भंग न करण्याची जबाबदारी आयोजकांची असेल.
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत असून, कायदा-सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग, संदेश शिर्के यांनी कळविले आहे.