अमुलकुमार जैन
अलिबाग : महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या शववाहिन्या सध्या रायगड जिल्हा परिषद (कुंटे बाग) आवारात निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. गेल्या महिन्यापासून कोणत्याही वापराशिवाय यातील पाच शववाहिन्या उघड्यावरच रखडलेल्या असल्याचे चित्र दिसत आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ३५० कोटी रुपयांच्या प्रस्तावातून १०० अत्याधुनिक शववाहिन्या खरेदी केल्या होत्या, यासाठी केंद्राने ३५ कोटींचा निधी मंजूर केला होता. आयशर कंपनीकडून बनवलेल्या या गाड्या आज वापराअभावी निष्क्रिय झाल्या असून बॅटऱ्या डाऊन झालेल्या आणि चाकांची हवा गेली आहे. दरम्यान, खासगी ॲम्ब्युलन्ससाठी सामान्य नागरिकांना हजारो रुपये खर्च करावे लागत असतानाही सरकारी शववाहिन्या उपलब्ध नसणे हे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक मानले जात आहे. अधिकृत वापरासाठी आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचा अभाव असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये आधीच शवगृह असून, २-३ तासांतील मृतदेह वाहतुकीसाठी सामान्य ॲम्ब्युलन्सच पुरेशी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर शववाहिन्यांचे खरेदीवर सरकारने पैसा खर्च का केला, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिक आणि काही कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान, अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महिनोंमहिने वेतन थकीत असतानाही अशा वाहनांची खरेदी होत असणे हे देखील टीकेचा विषय बनला आहे.