मुंबई : राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मनात सातत्याने येते आहे. वय सत्तरीच्या उंबरठ्यावर असून, विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या भीतीमुळे ते शक्य झाले नाही, अशी खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केली.
राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांत झोकून देऊन काम केले. उत्सव, शेती यामध्येही मी रमतो. पण आता वारंवार मनात येते की राजकारणातून निवृत्त व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणातील ज्येष्ठ नेते असलेल्या जाधव यांनी एक काळ शिवसेनेत घालवल्यानंतर मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र २०१९ मध्ये ते पुन्हा शिवसेनेत परतले.
“पवारांची साथ सोडणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती”, अशी कबुली देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. शरद पवार हे मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यांनी मंत्रिपदाला विरोध केला असे मला वाटत नाही. माझे राजकीय हित पाहणे हे त्या वेळच्या पक्षाचे काम होते, असे त्यांनी नमूद केले.
२०१९ मध्ये मंत्रिपदासाठी माझ्या नावाचा विचार झाला नाही हे वाईट वाटले, पण मी निराश झालो नाही. पक्षनेतृत्वाचा निर्णय अंतिम असतो, तो मी मान्य केला, असेही त्यांनी नम्रतेने सांगितले.