मुंबई : २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर अचानक ७६ लाख मतांची भर पडल्याच्या वादाला मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला आहे. यावर दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळत, कोर्टाने आरोपांमध्ये कोणताही ठोस आधार नसल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्या चेतन अहिरे यांच्यातर्फे बाजू मांडली होती. मात्र, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
या याचिकेमध्ये १९ मतदारसंघांमध्ये अधिकृत मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा दावा होता. तसेच मतदानाच्या अखेरच्या तासात ७६ लाख नव्या मतांची भर पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ही बाब उपस्थित करत मतदारवाढ “मॅच फिक्सिंग”चा भाग असल्याचा आरोप केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही ८% मतदार वाढल्याचं नमूद केलं.
यावर राज्य निवडणूक आयोगाने उत्तर देताना स्पष्ट केलं की, मतदार याद्या पारदर्शकपणे तयार केल्या जातात आणि सर्व मान्यताप्राप्त पक्षांना त्या वितरित केल्या जातात. आयोगानुसार, याद्यांवरील आक्षेपांसाठी १९ लाखांहून अधिक अर्ज आले, परंतु अंतिम टप्प्यात केवळ ८९ अपील प्राप्त झाले.