• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये वाहतूक कोंडीचा दिवसेंदिवस वाढता त्रास

ByEditor

Jun 26, 2025

विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका

अनंत नारंगीकर
उरण :
उरण शहरात बेशिस्त रिक्षा वाहतूक, अनधिकृत पार्किंग, आणि रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या गोंधळामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील आठ शाळांचे एकाच वेळेस सुटण्यामुळे त्या वेळी मोठी वाहतूक वाढते. त्याचवेळी अवजड वाहने शहरातून मार्गक्रमण करत असतात. याशिवाय काही रिक्षाचालक बेसावधपणे ओव्हरटेक करत, वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करतात. रिक्षा स्टँडवर क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यांचे अरुंदकरण होते.

शहरात दोन्ही बाजूंनी बेकायदेशीर पार्किंग आणि फळ-भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी रस्त्यावर अडथळा निर्माण केला आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते. वैष्णवी हॉटेल समोरील उंचवटाही वाहतुकीस अडथळा ठरते. या प्रश्नांमुळे दररोज शाळकरी विद्यार्थी, पालक आणि नागरिक हैराण झाले असून, वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून बिल्डर आणि ठेकेदारांच्या कामांकडेच लक्ष केंद्रीत केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या संदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!