सलीम शेख
माणगाव : वाहतूक शिस्तीचा अभाव आणि बेकायदेशीर वाहनधारकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कारवाईची मोहीम छेडली आहे. शहरातील मुख्य रस्ते, पुणे महामार्ग, चौक, बाजारपेठा, एसटी स्थानक, महाविद्यालय परिसर आणि महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. या कारवाईने बिनधास्त नियम उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हेल्मेट न वापरणे, प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, अनधिकृत नंबर प्लेट्स, लायसन्सशिवाय वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे, बुलेटवर कर्णकर्कश सायरन, ट्रिपल सीट, अपूर्ण कागदपत्रं, काळ्या काचा असलेली वाहने अशा अनेक नियमांची पायमल्ली सातत्याने वाढत होती. या प्रकारामुळे अपघातांची शक्यता अधिकच वाढली होती.
पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली, आणि रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी तपासणी सुरू असून, वाहनधारकांकडून नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कागदपत्र नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बेलदार, पोलीस कर्मचारी लहाने, कांबळे, शिवराज बांडे, शेरकर, धनवा, दहीफळे यांनी या मोहिमेत सहभाग घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही नाकाबंदी कारवाई केवळ एकदाच न होता, वाहतूक शिस्त पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत सुरु राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, कागदपत्रांची पूर्तता करावी, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करून स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. काही नागरिकांकडून तक्रारी येत असल्या तरी बहुतांश जनतेने या कारवाईचं कौतुक केलं आहे.