ॲड. राजीव साबळेंच्या नेतृत्वाखाली १० हजार नागरिकांचा सहभाग
सलीम शेख
माणगाव : मुंबई–गोवा महामार्गासह माणगाव व इंदापूर बायपासचे रखडलेले काम तातडीने सुरू व्हावे यासाठी १० जुलै रोजी माणगावमध्ये जोरदार जनआंदोलन होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना राज्य प्रवक्ते आणि माजी शिक्षण व आरोग्य सभापती ॲड. राजीव साबळे करणार असून, सुमारे १० हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
माणगाव शहरात दिवसरात्र वाहतूक कोंडीचा त्रास वाढत असून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. लोणेरे येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर माणगाव बायपास सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मूळ ठेकेदार चेतक कंपनी, पोटठेकेदार ॲम्को आणि निखील कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून सुरू असलेले काम आजतागायत अपूर्णच आहे.
या रखडलेल्या कामाची निविदा रद्द करून नव्या निविदेला मंजुरी मिळाल्याची माहिती ॲड. साबळे यांनी दिली. फेब्रुवारी २०२५ मध्ये ₹२६५.५८ कोटींच्या खर्चाने २५% कमी दरात नवीन निविदा मंजूर करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शिवाय नव्या कामासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली असल्याने पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे.
१६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बायपासच्या कामासाठी माणगावकरांचा संयम संपत चालला असून हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. पुलांचे काम प्राधान्याने पूर्ण करून संपूर्ण रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.
यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुनील तटकरे, मंत्री भरतशेठ गोगावले, आदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले तसेच पोलीस व प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.