मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार त्रस्त असून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे, अशी माहिती ठाकरे गटातील एका विश्वासूने दिली आहे.
शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार पक्षात वैतागले असून पक्ष सोडण्याची शक्यता आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे स्वतः स्थिर झाले आहेत. मात्र, पक्षात इतर कुणालाही किंमत मिळत नसल्याची तक्रार आमदार आणि खासदारांकडून केली जात असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.
विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंकडे निरोप पाठवला होता. शिंदे गटामध्ये आमची गळचेपी होत असल्याची माहिती देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्याचबरोबर गजानन कीर्तिकर आणि तानाजी सावंत यांनी देखील असंतोष व्यक्त केला आहे. शिंदे गटात (Eknath Shinde) गेलेल्या आमदारांची आणि खासदारांची कोंडी झाली आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, नवीन संसद इमारत भव्य-दिव्य आहे. विक्रमी काळामध्ये ही इमारत उभारली गेली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आम्ही कौतुक करतो. मात्र, या भव्य कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची उपस्थिती असती तर काय झालं असतं? असा सवाल देखील विनायक राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.