मुंबई : महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने एनडीए सरकारविषयी सर्वसामान्यांच्या भावनांवर एक सर्वेक्षण केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांचे काय मत आहे, हेही या सर्वेक्षणात जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड कराल, असा प्रश्नही ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात विचारण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता सर्वेक्षणाच्या निकालातून दिसून येत आहे, तर सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. आज निवडणुका झाल्या तर भाजप राज्यात नंबर वन पक्ष ठरू शकतो आणि त्यांना एकूण ३३.८ टक्के मते मिळू शकतात, तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेला केवळ ५.५ टक्के मते मिळू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण एनडीएला केवळ ३९.३ टक्के मते मिळू शकतील असं सर्वेक्षणा म्हटलं आहे.
महाविकास आघाडीला सर्वाधिक ४७.७ टक्के मते मिळू शकतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. या सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वाधिक १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १२.५ टक्के मते मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात नोंदविण्यात आली आहे. याशिवाय बहुजन वंचित आघाडीला २.९ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ०.७ टक्के, ओवेसी यांच्या पक्षाला एआयएमआयएमला ०.६ टक्के, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला ०.५ टक्के आणि इतरांना १.७ टक्के मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे यामध्ये केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला देखील ०.५ टक्के मतं दिसत असली तरी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात भूमिका, वक्तव्य आणि राजकीय हालचाली करणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचं नावं मतदारांच्या ओठावर सुद्धा दिसत नाही. त्यामुळे मनसेचं आगामी निवडणुकीत अस्तित्व संपुष्टात येतंय का अशी चिंता व्यक्त करणारी आकडेवारी या सर्वेक्षणात दिसत आहे असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत अभूतपूर्व उठाव करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची स्वीकारण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली होती. इतकंच नाही तर शिंदे गटाला शिवसेनेचा पक्ष आणि पक्ष चिन्हही मिळालं. त्यामुळे शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्याचे बोलले जात होते, पण ताज्या सर्वेक्षणामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण मतदारांना शिंदेंचा शिवसेनेला संपविण्याचा कट रुचलेला नसून ते शिंदेंना कायमची अद्दल घडवतील असे सर्वेक्षणातील आकडेवारीतून दिसून येतंय.
