मणिपूर घटनेचा निषेध करत आदिवासी समाजाकडून मोर्चा
गणेश पवार
कर्जत : ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे दुर्घटनेत आदिवासी बांधव दरडीखाली गाडले गेले तर मणिपूर येथे आदिवासी समाजाच्या महिलांवर अत्याचार करत तेथील आदिवासी बांधवांवर देखील अन्याय करण्यात आला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात आज आदिवासी दिन शांततेत साजरा करत निषेध मोर्चा काढण्यात आला. तर प्रशासनाला आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देखील देण्यात आले.

२९ डिसेंबर १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून जाहीर केला. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात कर्जत व सुधागड या दोन तालुक्यात आदिवासी बांधवाची संख्या अधिक आहे. त्यामध्ये कर्जत तालुका भौगोलिकदृष्टया पसरलेला असून यामध्ये डोंगर, दुर्गम भाग अधिक आहे. या डोंगरभागात आदिवासी समाजाची संख्या देखील मोठी आहे. कर्जत तालुक्यात गेली ६ वर्षे आदिवासी ठाकूर-कातकरी आदिवासी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आयोजित केला जातो. दरवषी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव जमत बाईक रॅली काढत, आदिवासी पारंपरिक नृत्य करत हा दिवस अत्यंत आनंदात, उत्साहात साजरा करतात. मात्र यंदा कर्जत तालुक्याला लागून असलेल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड दुर्घटना घडून येथील ठाकूरवाडी त्या दरडीखाली गाडली गेली. अनेक संसार उध्वस्त झाले तर अनेक माणसे, गुरे त्या दरडीखाली गाडली गेली. दुसरीकडे मणिपूर येथे आदिवासी समाजाच्या महिलांवर अत्याचार करत अनेकांची घरे जाळण्यात आली. या दोन्ही घटनांची किनार यंदाच्या आदिवासी दिनाला असल्याने यंदा आदिवासी दिन आनंदात साजरा न करण्याचा निर्णय समाजाने घेतला होता. त्यानुसार आज सकाळी नेरळ येथील कोतवालवाडी येथे सगळे आदिवासी बांधव यांनी जमून येथील हुतात्मा स्तंभास मानवंदना दिली. त्यानंतर नेरळ शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास व नामफलकास पुष्पहार अर्पण करत सर्व समाज बांधव यांनी कर्जत मार्केट यार्ड येथे जमा झाले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा आदी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांचे नमन करण्यात आले. यानंतर इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी जमलेल्या आदिवासी बांधवाना प्रबोधन करण्यात आले आदिवासी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यातील जाती पाती बाजूला ठेवून आता एकत्र यावे लागेल. यासह आम्हाला तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वीज रस्ते आणि पाणी, मात्र भारताने अंतराळात चंद्रावर यान सोडलं, पण या राज्यात आजही अनेक ठिकाणी रस्ते नाहीत ही भयावह गोष्ट आहे. एका बाजूला चंद्रावर पोहचण्यासाठी रस्ता भेटलेल्या भारतात आदिवासी पाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही हि शोकांतिका असल्याचे सांगण्यात आले. तर आदिवासी समाजासाठी शासन कटिबद्ध असून आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिवासी समाजासाठी योगदान दिलेलं असून यापुढे देखील समाजासाठी आमदार थोरवे कायम सोबत असल्याचे सांगत आदिवासी दिनानिमित्त युवा नेते प्रसाद थोरवे यांनी शुभेच्छा दिल्या. तदनंतर येथील आदिवासी समाजाचा मोर्चा प्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत येथे धडकर शिष्टमंडळाने येथे नायब तहसीलदार प्रसाद पाटील याना निवेदन दिले. तर पुढे बाजारपेठ करत तहसील कार्यालय कर्जत येथे मोर्चा धडकत आदिवासी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ. शीतल रसाळ याना मणिपूर घटनेचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली तसेच आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या प्रमुख मागण्या असलेले निवेदन सादर केले. जिल्हाभर हे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी युवा नेते प्रसाद थोरवे, ऋषिकेश राणे, आदिवासी ठाकूर संघटनेचे परशुराम दरवडा, जयवंती हिंदोळा, दत्तात्रेय हिंदोळा, वसंत ढोले, गणेश पारधी, मोतीराम पादीर आदींसह मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते.