मुंबई : 11 जुलै 2006 रोजी झालेली लोकल साखळी बॉम्बस्फोटांची हृदयद्रावक घटना आजही मुंबईकरांच्या स्मरणात ताजी आहे. संध्याकाळी 6.24 वाजता सुरू झालेल्या स्फोटसत्रात 11 मिनिटांत सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर स्थानकांजवळील प्रथम श्रेणी डब्यांमध्ये स्फोट घडवले गेले.
या भयंकर घटनेत 209 जणांचा मृत्यू झाला आणि 824 जण गंभीर जखमी झाले. तपासात आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची माहिती उघड झाली. स्फोटकांचा पुरवठा गोवंडी परिसरातून झाल्याचा संशय आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI तसेच लष्कर-ए-तोयबा यांचा सहभागही तपासात समोर आला होता. या प्रकरणी आता सर्व 12 आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
गुन्हेगारी तपास आणि अटकसत्र
दहशतवादविरोधी पथकाने 20 जुलै ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान संशयितांची धरपकड सुरू केली. पुढील आठवड्यांमध्ये 400हून अधिक व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. 13 आरोपींविरुद्ध खटला चालवण्यात आला. सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांच्याकडून इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळ याचे नाव पुढे आले.
खटला, न्यायालयीन कारवाई आणि निकाल
2007 मध्ये विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली. मकोका कायद्याविरोधातील याचिकेमुळे काही काळ खटला थांबला होता. त्यानंतर 2010 मध्ये सुनावणी पुन्हा सुरू झाली. 192 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारीही होते. तपासासाठी 7 विशेष टीम आणि केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने काम सुरू होते. तपासादरम्यान एकूण 400 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अखेर 13 आरोपींपैकी 12 जणांना दोषी ठरवण्यात आलं. ही घटना केवळ मुंबईपुरती मर्यादित राहिली नाही, तर देशभर त्याचे पडसाद उमटले.
अखेर, पुराव्याअभावी सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता जाहीर झाली. यापूर्वी 5 जणांना फाशी, 8 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली होती.