रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदीचे वेळापत्रक:
- 23 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपासून ते 29 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत
- 2 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपासून ते 4 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत
- 6 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत
ही माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
मंत्र्यांची ग्वाही — गणपतीपूर्वी महामार्ग सुस्थितीत
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच रायगड जिल्ह्यात येऊन महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी, “गणपती उत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत केला जाईल,” अशी ग्वाही दिली.
पाहणी दौऱ्यावर वाद
मात्र, विरोधकांनी मंत्री भोसले यांच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा दौरा धावता ठरल्याने परशुराम घाटातील वारंवार होणारे अपघात आणि दुरुस्तीची गरज याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. रायगडनंतर थेट रत्नागिरीकडे रवाना होताना मंत्र्यांनी महामार्गाची पाहणी ‘टॉप गिअर’मध्ये आटोपल्याची चर्चा रंगली आहे.
