बाधित लोकांचे पंचनामे त्वरित करा, नुकसानग्रस्तांची शासनाकडे मागणी
किरण लाड
नागोठणे : महाराष्ट्र राज्याला १९ ते २३ जुलैच्या मुसळधार पावसाने झोडपले होते. राज्यातील अनेक भागातील नद्यांना पूर आले होते, काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी बरोबर वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती.अशा आस्मानी संकटात राज्यातील बाधित लोकांना धीर देण्यासाठी शासनाकडून मदतीचा हात म्हणून पावसाळी अधिवेशनात नैसर्गिक आपत्तीमधील बाधित लोकांना, दुकानदार व टपरीधारक यांना नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात मुसळधार पाउस पडुन नागोठण्यातील अंबा नदीला पूर येऊन पूराचे पाणी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, बाजारपेठ, कोळीवाडा, मच्छी, मटण मार्केट, हाॅटेल लेक व्ह्यू परिसर, उर्दू हायस्कूल, मोहल्ला या परिसरात शिरले होते. नागरिकांच्या घरात तसेच दुकानात पूराचे पाणी जाऊन वित्तहानी झाली होती. पावसाळी अधिवेशनात नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नुकसानग्रस्त टपरीधारक व दुकानदार यांना अनुक्रमे रुपये १० हजार व रुपये ५० हजार तलाठी पंचनामा तसेच अन्य कागदपत्रे घेऊन मदत देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. असे जरी असले तरी नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, कोळीवाडा, मच्छी व मटण मार्केट परिसर, हॉटेल लेक व्ह्यू परिसर, उर्दू हायस्कूल, मोहल्ला या भागातील नागरिकांचे घरांचे, दुकानांचे पंचनामे, मालमत्तेचे पंचनामे तलाठी नागोठणे यांनी अजूनही केलेच नाही, तर मग आम्हाला नुकसान भरपाई मिळेलच कसी अशी तक्रार येथील परिसरातील नागरिकांनी तसेच टपरीधारक व दुकानदारांनी केली आहे.
शासनाने राहिलेल्या आपत्तीग्रस्त नागरिकांचे व दुकानांचे पंचनामे लवकरात लवकर करावे तसेच परवाना सारख्या अटी शिथिल कराव्या, त्याला पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी येथील नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहेत.
जुलै महिन्याच्या नैसर्गिक आपत्तीत मुसळधार पावसामुळे अंबा नदीला पूर येऊन पाणी येथील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, कोळीवाडा, मच्छी-मटण मार्केट, हाॅटेल लेक व्ह्यू परिसर, उर्दू हायस्कूल, मोहल्ला या परिसरातील नागरिकांच्या घरात तसेच दुकानात घुसुन मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे. बाधित लोकांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने मदत जाहीर केलेली आहे. त्यासाठी तलाठी पंचनामा व इतर कागदपत्रे सादर करण्याची अट शासनाने ठेवली आहे. वरील आपत्तीग्रस्त भागातील पंचनामे तलाठी गणेश विटेकर यांनी अजुनही केलेले नाहीत. बाधीत लोकांची यादी माझ्याकडे आहे. त्यामुळे ही लोक शासनाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच टपरीधारकांना व छोटे व्यापारी यांना दुकाने आस्थापना परवाना यांसारख्या अटीतुन सुट मिळावी किंवा त्याला अन्य पर्याय उपलब्ध करावा.
-अतुल काळे,
माजी ग्रा. पं. सदस्य, नागोठणे.
यासंदर्भात नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांच्याशी संपर्क साधला असता मी खाजगी कामासाठी बाहेर आलेलो असून पंचनामे केल्याची यादी बघुन माहिती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.