जॅकवेल पडले कोरडे, माणगावात एक दिवस आड करून पाणी
सलीम शेख
माणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ काळ नदीतील पाण्याची पातळी घसरल्याने नागरीकातून भीतीचे वातावरण पसरले असून माणगावला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. काळनदी माणगावकरांच्या उशाला, कोरड पडली घशाला असी स्थिती सध्या दिसत आहे. काळ नदीवरील पाण्याचे नियोजन नगरपंचायतीने वेळीच केले असते तर नागरिकांना पाणी टंचाई कांही अंशी भासली नसती. प्रचंड उष्णतेमुळे यंदाचे वर्षी नदीतील पाण्याची पातळी दिवसेदिवस खालावत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने एक दिवस आड करून पाणीपुरवठा करण्याचे नगरपंचायतीने ठरवले आहे. त्यामुळे नागरिक हादरले आहेत. माणगावचा पाणी प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
माणगाव नगरपंचायतीत सन २०११ च्या जनगणनेनुसार १९ हजार लोकसंक्या आहे. १७ प्रभाग येत असून भादाव, जुने माणगाव, खांदाड, नाणोरे, उतेखोल, उतेखोलवाडी, दत्तनगर, साईनगर, क्रांतीनगर, आदर्श समतानगर, विरेश्वर नगर, विद्या नगर, बामणोली रोड, सिद्धी नगर, सुतारआळी, ढालघरफाटा, बाजारपेठ, मोर्बा रोड अशा विविध भागात दहा लाईन द्वारे नगरपंचायती कडून पाणी पुरवठा केला जातो. सध्या काळ नदीवरील पाण्याची पातळी आटल्याने एक दिवस पाणी पुरवठा नगरपंचायती कडून केला जात आहे. उतेखोल भागात काळ नदीवर ज्याक्वेल १९७२ साली माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच स्वर्गीय अशोकदादा साबळे हे सरपंच असताना बसवले होते. त्यावेळी हि योजना जीवन प्राधिकरणकडे होती. त्यानंतर माणगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली त्यात वेळोवेळी सुधारणा करीत हि योजना वाढत्या लोकसंख्येनुसार कार्यान्वित करण्यात आली. सन २०१५ मध्ये ती माणगाव नगरपंचायतीचे ताब्यात आली.
एक दिवस आड करून नागरिकांना पाणी नगरपंचायतीने सोडण्याचा निर्णय घेतला असून अनेक भागात हे पाणी कमी दाबाने तर कांही भागात कमीच पाणी पडत आहे. त्यातच अनेक नागरिक नळाला पंप बसवून पाणी खेचत आहेत त्यांच्यावर कारवाई कोण करणार ? हा प्रश्नच आहे. त्यातच पाणी पातळी घटल्याने नागरिकांना या पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार असून माणगावला हि पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. स्वर्गीय माजी आ. अशोकदादा साबळे हे हयात असताना त्यांनी माणगावची भाविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी काळ नदीवर खांदाड येथे मोठा बंधारा बांधावा असी मागणी लाऊन धरली होती. त्यामुळे माणगावला मुबलक पाणी मिळेल व ते भविष्यात कधीच कमी पडणार नाही असे सुचविले होते. त्याची आठवण आज नागरीकातून बोलताना व्यक्त होत आहे. खांदाड परिसरात काळ नदीचे पाणी कधीच आटत नाही. त्याठिकाणी जाक्वेल उभारल्यास माणगावचा कायमचा पाणी प्रश्न सुटल अशी नागरीकातून आशा व्यक्त होत आहे. माणगाव नगरपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली असून हे पाणी कधी सुटणार हा प्रश्न अनुउत्तरीत राहणार आहे.