कार्यालय २५ एप्रिलपासून बंद; ग्रामस्थ उघडून देत नाही -ग्रामसेविका सुप्रिया पाटील
घनःश्याम कडू
उरण : तालुक्यातील ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण गाजत आहेत. परंतु उरण पंचायत समितीमधील अधिकारी वर्ग भ्रष्टाचार उघड करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्यातच धन्यता मानीत असल्याचा आरोप तालुक्यातील ग्रामस्थांकडून केला जात आहे. जनतेचे प्रश्न प्रलंबित असताना मात्र आपले कार्यालय सूसज्ज करण्यात मग्न आहेत. हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालय दि. 25 एप्रिलपासून बंद अवस्थेत आहे. ते उघडण्यास ग्रामस्थ विरोध करीत असल्याचे ग्रामसेविका सुप्रिया पाटील यांनी सांगितले.
उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमधील गेली अनेक वर्षे दप्तरच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. तसेच शासकीय निधींचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामसेवकांनी सत्ताधार्यांच्या मदतीने केला आहे. यांच्या लेखी तक्रारी मुख्यमंत्री कक्षाकडे करून दाद मागितली आहे. त्यांचे चौकशी करण्याचे लेखी पत्र उरण पंचायत समिती अधिकारी वर्गाकडे येऊनही ते कारवाई करण्यास चालढकलपणा करीत आहेत. उलट तक्रारदारांकडूनच पुरावे मागितले जात आहेत. परंतु ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, अशा ग्रामसेवकांची पाठराखण करीत आहेत. यावरून अधिकारी वर्गानाही भ्रष्टाचार उघड करावयाचा नसल्याचे उघड होते.
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतच्या मागील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उरण पंचायत समितीचे अधिकारी वर्ग गेले असता त्यांना कार्यालयात अडकवून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही आजतागायत कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्या दिवसापासून म्हणजे दि. 25 एप्रिलपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद आहे. कार्यालय उघडण्यासाठी ग्रामसेविका सुप्रिया पाटील गेल्या असता त्यांना ग्रामस्थ विरोध करीत आहेत. आज महिना होऊन गेला तरीह कार्यालय बंद आहे. यामुळे ग्रामस्थांच्या कामांचा खोळंबा होत आहे. याबाबतही उरण पंचायत समिती ग्रामविस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) विनोद मुंडे यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसते. तसेच मिंडे यांना फोन किंवा व्हाट्सएपच्या माध्यमातून मेसेज केला तरी ते प्रतिक्रिया सोडा मेसेज पहातही नाही. प्रत्यक्षात कार्यालयात भेट झाल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत असतात. अशा मग्रूर अधिकार्यांकडून न्याय मिळणे कठीण बनले आहे. उरण तालुक्यातील ग्रामपंचायत मधील अनेक भ्रष्टाचार प्रकरणाच्या तक्रारी दाखल असूनही त्यावर कारवाई अथवा ठोस उपाययोजना करण्यावर उरण पंचायत समितीचे अधिकारी वर्ग अपयशी ठरत आहेत. परंतु ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत, त्या ग्रामसेवकांबरोबर अधिकारी वर्ग नेहमीच एकीने कुठल्या तरी हॉटेलमध्ये ताव मारत असल्याचे चित्र पहावयास मिळते. यामुळेच कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण होत आहे. त्यामुळे उरण ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी तो वाढताना दिसत आहे. तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा होणार्या दुष्परिणामास प्रशासन जबाबदार राहील अशी संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.