• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या; ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ ला मतमोजणी

ByEditor

Jan 29, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणूक कार्यक्रमात बदल; उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार वाढीव वेळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाने जाहीर केलेला शासकीय दुखवटा आणि सार्वजनिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रचारासाठी उमेदवारांना दिलासा

निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या नियोजनानुसार बुधवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी सात दिवसांचा कालावधी मिळणार होता. मात्र, बुधवारी शासकीय सुट्टी आणि तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे प्रचाराचे गणित बिघडले होते. दुखवट्यामुळे प्रचाराला केवळ चार दिवस मिळाले असते. ही बाब लक्षात घेऊन उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा आणि निवडणूक कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी निवडणूक कार्यक्रम दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असेल नवे वेळापत्रक:

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सुधारित तारखा खालीलप्रमाणे आहेत:

मतदान दिनांक: ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार)

मतमोजणी दिनांक: ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार)

राजकीय हालचालींना वेग

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी बुधवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे. आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रचारासाठी दोन अतिरिक्त दिवस मिळाल्याने उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुखवट्याचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार असून, ७ तारखेला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!