महाड । मिलिंद माने
मार्च महिना सरता सरता महाड आणि परिसरात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी तापमानाचा पारा थेट ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. या वाढत्या उष्म्याचा फटका मानवी आरोग्यासह शेतीलाही बसू लागला आहे.
दैनंदिन जीवनावर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत होते, मात्र बुधवारपासून उष्णतेत अचानक मोठी वाढ झाली. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून बाजारपेठेतील उलाढालीवरही याचा परिणाम दिसून येत आहे. उन्हामुळे मळमळणे, उलटी, डोकेदुखी आणि अपचन यांसारख्या उष्णतेच्या आजारांनी डोके वर काढले आहे. काही भागात पडणाऱ्या हलक्या पावसामुळे वातावरणात अधिकच उकाडा (ह्युमिडिटी) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतीवर संकटाचे सावट
हवामानातील या टोकाच्या बदलामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आंबा पीक आधीच संकटात आले असताना, आता शेतातील उर्वरित कडधान्ये देखील करपून हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.
तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा
वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.
संरक्षण घ्या: उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री किंवा चेहऱ्याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडा.
वेळ पाळा: शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे.
