• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महावितरणचा श्रीवर्धनकरांना ‘शॉक’; कार्यालय शहराबाहेर हलवल्याने ग्राहकांची ससेहोलपट

ByEditor

Mar 27, 2026

शहरात ‘वीज बिल भरणा केंद्र’ सुरू करण्याची मागणी

श्रीवर्धन । संदेश घोलप
महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे श्रीवर्धनमधील वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कार्यालय तब्बल ३ किलोमीटर लांब आरठी हद्दीत हलवल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. “आमचे हक्काचे बिल भरणा केंद्र शहरातच हवे,” असा आक्रमक पवित्रा आता श्रीवर्धनकरांनी घेतला आहे.

प्रशासकीय निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका

पूर्वी महावितरणचे कार्यालय मुख्य बसस्थानकासमोर असल्याने नागरिकांना वीज बिल भरणे किंवा तक्रार करणे सोपे होते. मात्र, २०२१ पासून हे कार्यालय शहराबाहेर हलवण्यात आले. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब कष्टकरी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. बसस्थानकावरून नवीन कार्यालयापर्यंत जाण्यासाठी नाहक रिक्षा भाडे मोजावे लागत असल्याने, “बिल भरण्यापेक्षा प्रवासाचा खर्चच जास्त,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

डिजिटल इंडियाचा दिखावा; जमिनीवर अंधार!

प्रशासन ऑनलाइन सुविधेचे गोडवे गात असले, तरी आजही अनेक ग्रामीण भागातील जनता आणि ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्टफोन्स नाहीत. अशा स्थितीत “ऑनलाइन बिल भरा” असे सांगून प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे. मीटरमधील बिघाड, चुकीचे बिल किंवा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यांसारख्या तक्रारींसाठी ग्राहकांना भर उन्हात ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

प्रमुख मागण्या आणि आंदोलनाचा इशारा

श्रीवर्धनमधील जागरूक नागरिकांनी प्रशासनासमोर खालील मागण्या मांडल्या आहेत:

  • मध्यवर्ती केंद्र: बसस्थानक परिसर किंवा प्रशासकीय भवनाजवळ त्वरित ‘वीज बिल भरणा आणि तक्रार निवारण केंद्र’ सुरू करावे.
  • आर्थिक भुर्दंड: चुकीच्या नियोजनामुळे ग्राहकांना बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडाला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
  • तीव्र इशारा: प्रशासनाने लवकरात लवकर शहरात केंद्र सुरू केले नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी “मालकीच्या जागेत कार्यालय नेल्याचे” समर्थन केले आहे. तसेच “ग्राहकांनी मागणी केल्यास विचार करू,” अशी पुष्टी जोडली आहे. मात्र, केवळ आश्वासनावर समाधान न मानता प्रत्यक्ष कृती व्हावी, अशी मागणी श्रीवर्धनकरांनी लावून धरली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!