रायगड जनोदय वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून निरपराध प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. नुकत्याच लोहारमाळ गाव हद्दीत घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
महामार्गाच्या कडेला किंवा थेट रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा उपाय न करता उभी केली जाणारी ट्रक, टेम्पो व इतर जड वाहने अपघातांना निमंत्रण देत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांची दृश्यता कमी असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना धोका अधिक वाढतो.
पनवेलपासूनच या समस्येची सुरुवात होत असून महाड, पोलादपूर आणि पुढील घाट विभागातही ठिकठिकाणी अवजड वाहने बेकायदेशीररीत्या उभी केलेली दिसतात. अनेक वेळा चालक विश्रांतीसाठी किंवा तांत्रिक बिघाडामुळे वाहने रस्त्यावरच सोडून देतात; मात्र आवश्यक इशारे किंवा सुरक्षेची साधने न वापरल्याने इतर वाहनचालकांसाठी हा जीवघेणा सापळा ठरतो.
महामार्गावर उभ्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर तत्काळ कारवाई करून दंडात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच महामार्गावर निश्चित पार्किंग झोन उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल.
पोलादपूरच्या अपघातानंतर आता तरी महामार्ग पोलीस आणि वाहतूक विभाग अवैध पार्किंगच्या विळख्यातून महामार्गाला मुक्त करणार का? की आणखी एखाद्या निष्पाप कुटुंबाचा बळी जाण्याची वाट पाहणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महामार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रशासन, वाहतूक विभाग आणि वाहनचालक यांनी संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, अन्यथा “अपघातप्रवण मार्ग” अशीच मुंबई-गोवा महामार्गाची ओळख कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
