रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात रंगत; राजकीय वर्तुळाचे लक्ष
रायगड | अमुलकुमार जैन
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ६ उमेदवारांनी १२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून, या निवडणुकीतील चुरस आता अधिक वाढली आहे. दाखल झालेल्या या अर्जांची आज (मंगळवारी) छाननी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी सर्वप्रथम एक नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यानंतर सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित पाच उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक कार्यालयात सादर केले.
पक्षाचे अधिकृत आणि अपक्ष उमेदवार पुढीलप्रमाणे:
- सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ४ अर्ज
- अनिकेत सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – ४ अर्ज
- अरविंद पुंडलिक म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) – १ अर्ज
- मानसी संतोष म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) – १ अर्ज
- जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) – १ अर्ज
- अनिल रमेश चोपडा (अपक्ष) – १ अर्ज
छाननीकडे सर्वांचे डोळे
या निवडणुकीसाठी एकूण ६ उमेदवारांकडून १२ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. मंगळवारी होणाऱ्या छाननी प्रक्रियेनंतर कोणते अर्ज वैध ठरतात आणि कोणते बाद होतात, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. छाननीनंतरच निवडणुकीच्या रिंगणातील खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमधून निवडून द्यावयाच्या या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही कंबर कसली असून, संपूर्ण कोकण आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात या निवडणुकीची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
