• Sun. Jun 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जासई तलावात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू; उरण तालुक्यात हळहळ

ByEditor

Jun 7, 2026

उरण: घनःश्याम कडू
पावसाळ्याची सुरुवात होत असतानाच उरण तालुक्यातील जासई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी गावातील तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळ्याच्या तोंडावर घडलेल्या या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण उरण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

खेळता खेळता काळाची झडप

शनिवारी (दि. ६ जून २०२६) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हरियाणा रमजान परवीन (वय ८), रवीना रमजान परवीन (वय ७) आणि सौम्या कन्हैया प्रजापती (वय १३) अशी मृत मुलींची नावे आहेत. या तिन्ही मुली जासई गावातील तलावात अंघोळीसाठी गेल्या होत्या. खेळता-खेळता त्या तलावातील खोल पाण्यात गेल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीही बुडू लागल्या.

मुलींचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने मुलींना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जासई परिसरात एकच आक्रोश सुरू झाला.

रोजगारासाठी आलेले कुटुंब उघड्यावर

मयत तिन्ही मुली जासई गावातील इस्माईल यांच्या चाळीत राहत होत्या. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे असून, उरण परिसरात रोजगारासाठी आले होते. आपल्या चिमुकल्या लेकरांचा असा अकाली अंत झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकही या घटनेने सुन्न झाले आहेत.

जलसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेने जलाशयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पाऊस सुरू होताच तलाव, बंधारे आणि खाणींमधील पाण्याची पातळी वाढते. दरवर्षी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली, तरी निष्पाप जीवांचे बळी जाण्याचे सत्र थांबलेले नाही.

उरण पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

पालकांनो, काळजी घ्या!

पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात तीन चिमुकल्यांचा बळी गेल्याने ही घटना प्रत्येक पालकासाठी मोठा इशारा मानली जात आहे. लहान मुलांना जलाशयांपासून दूर ठेवणे आणि त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर तरी प्रशासन जलसुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!