ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात, शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. एका मालगाडीशी या ट्रेनची धडक झाली व ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात 350 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर, तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनच्या स्लीपर बोगी वगळता संपूर्ण ट्रेन(17-18 डब्बे) रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन एका मालगाडीला धडकली आणि नंतर रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्लनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही ट्रेन एकाच पटरीवर आल्याची माहिती आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी मदतीने बचावकार्य सुरू आहे.
विशेष मदत आयुक्त कार्यालयाने सांगितले की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय ट्रॅक साफ करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या, याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.