नवी मुंबई विमानतळाला नाव न देणे ही शोकांतिका; सरकारला ‘दिबां’च्या नावाची ॲलर्जी!
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी जासई येथे अभिवादन
उरण | विठ्ठल ममताबादे
अत्याधुनिक सेवा-सुविधांनी परिपूर्ण असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन सहा महिने झाले आहेत. आता लवकरच तेथून आंतरराष्ट्रीय विमाने उडतील. परंतु, अद्यापही या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव दिले गेले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सरकारला दिबांच्या नावाची ॲलर्जी असून त्यांना त्यांच्या ‘बॉस’चे नाव द्यायचे आहे, अशी घणाघाती टीका १९८४ च्या ऐतिहासिक सिडको आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांनी केली.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीताई पोवार कोल्हापूरहून जासई (ता. उरण) येथे दिबांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. जासई येथील स्मृतिस्थळावर दिबांच्या आठवणींनी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर त्यांनी पनवेल येथील ‘संग्राम’ बंगल्यावर जाऊन दिबांना अभिवादन केले. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत सोबत होते, तर दिबांची सून मनीषा पाटील यांनी भारतीताईंचे स्वागत केले.
…म्हणून आंदोलनाची धग गावोगावी पसरली!
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत भारतीताई म्हणाल्या, “१९८४ च्या आंदोलनावेळी मी २३ वर्षांची होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून शेकापची कार्यकर्ती म्हणून काम करत असल्याने नसानसांत आंदोलन भिनले होते. दिबांचा आदेश शिरसावंद्य मानून मी आंदोलनात उतरले. तत्कालीन सरकारने दिबांसह प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबल्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असा सरकारचा समज होता. मात्र, मी १०-१२ गावांत पायी फिरून गुप्त बैठका घेतल्या. हातावर पोट असणाऱ्या महिलांना जमीन संपादन विषय आणि सरकारकडून होणारी फसवणूक सोप्या भाषेत समजावून सांगितली. त्यामुळेच गावोगावी आंदोलनाची धग पसरली आणि जमीन संपादनाच्या दिवशी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले.”
पोलिसांनी केला होता बेछूट गोळीबार
आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि बेछूट गोळीबार केला. सरकारच्या बिनडोकपणामुळे त्यात ५ शेतकरी हुतात्मा झाले. मात्र, दिबांच्या खंबीर नेतृत्वामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि पुढे ‘साडेबारा टक्के’ जमिनीचा सुवर्णमहोत्सवी फॉर्म्युला देशभर लागू झाला. दिबांनी मंडल आयोगाचा लढाही यशस्वी करून ओबीसी समाजाला हक्क मिळवून दिला, असेही त्यांनी नमूद केले.
’आताचे सरकार केवळ मिंधे’
”दिबा हे तत्त्वाशी जगणारे नेते होते. पण सध्याचे सरकार केवळ ‘मिंधे’ हवे असणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता यांना चालत नाही. विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगीच दिबांचे नाव लागायला हवे होते, मात्र सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला. आता या नावासाठी तरुण जर पुन्हा पेटून उठले, तर मी आजही नेतृत्वाची धुरा सांभाळायला तयार आहे,” असा इशारा भारतीताईंनी दिला.
भूमिपुत्रांचा सरकार अंत पाहत आहे का? : महेंद्रशेठ घरत
यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता असून ते अठरापगड जातींचे नेते होते. मुख्यमंत्री महोदयांनी अनेकदा विमानतळाला दिबांचे नाव देण्याची घोषणा केली. मग विमानतळ सुरू होऊन सहा महिने झाले, आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तयारी झाली, तरीही अद्याप नाव का दिले नाही? सरकार भूमिपुत्रांचा अंत पाहत आहे का? सरकारने झोपेचे सोंग घेऊन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, हे लांच्छनास्पद आहे.”
उपोषणकर्त्या रश्मिता पोपेटा यांना पाठिंबा
दरम्यान, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळण्यासाठी रश्मिता पोपेटा यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. भारतीताई पोवार आणि महेंद्रशेठ घरत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. आज दिवसभरात सर्वपक्षीय नेत्यांनीही जासई येथे येत लोकनेते दिबांना अभिवादन केले.
