• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील शेतजमिनी बिल्डर लॉबी व उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न!

ByEditor

Jun 6, 2023

• मोठी जुई येथील 5 एकर जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रकार
• रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमिन खरेदी, विक्रीत मोठी फसवणूक

विठ्ठल ममताबादे
उरण :
तालुक्यातील मोठी जुई येथील मूळ स्थानिक असलेल्या शेतकऱ्यांची 5 एकर जमीन जबरदस्तीने बळकविण्याचा प्रयत्न सुरु असून 5 एकर जमिनीचा भाव अंदाजे 400 कोटी असून हि जमीन 1989 साली दोघा शेतकऱ्यांना एकूण 27000 रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र पोलीस प्रशासनाच्यावतीने जबरदस्ती करून शेतकऱ्यांवर जमीन देण्यास दबाव टाकला जात आहे. त्यामूळे संतप्त शेतकऱ्यांनी गावठाण चळवळीचे नेते राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत या विरोधात लढा उभारत प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

उरण तालुक्यात अनेक नवनविन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्प येत आहेत. त्यामुळे महत्वाच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोल भावाने संपादित करण्यात येत आहेत. नंतर याच संपादित केलेल्या जमिनी करोडो रुपयाने विकून जमिनी बिल्डर, उद्योगपतीच्या घशात घातले जात आहे. जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा, अशिक्षितपणाचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे व यातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे. उरणमध्ये असे अनेक प्रकार होत असून नुकताच उरण तालुक्यातील मोठी जुई येथील जमीन प्रकरणाचा वाद समोर आला आहे. 1989 साली कमलेश छोटालाल पारेख, रा. मुंबई यांनी मोठी जुई येथील जमीन विकत घेतली. तेव्हा कोणतेही खरेदी खत किंवा रजिस्ट्रेशन न करता एका व्यक्तीला पंधरा व दुसऱ्या व्यक्तीला 12 हजार रुपये दिले. मात्र कागदोपत्री तसा व्यवहार कुठेही झाला नाही. केवळ तोंडी हा व्यवहार झाला मात्र शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनीचा ताबा पारेख यांना कधीच दिला नव्हता. 1989 पासून कमलेश पारेख मोठी जुई येथे एकदाही आले नाही किंवा त्यांनी शेती केली नाही. 1989 पासून गावातील स्थानिक रहिवाशी ही शेती करत आले आहेत. कसेल त्याची जमीन या महाराष्ट्र कायद्यान्वये कुळ कायद्यानुसार जो शेती करेल त्याची त्या जमीनीवर मालकी हक्क प्राप्त होते. 1989 सालापासून गावकरी शेती करत आल्याने शेतकऱ्यांनी सदर 5 एकर जमिनीवर मालकी हक्काचा दावा केला आहे. तसेच ही जमीन कोणालाही विश्वासात न घेता विवेक ज्ञानेश्वर पाटील, रा. तुर्भे, नवी मुंबई यांना कमलेश पारेख यांनी परस्पर जमीन विकली आहे. विवेक ज्ञानेश्वर पाटील यांचा शेतीशी किंवा त्या जागेशी कोणताही संबंध नाही असे असताना पोलीसांना हाताशी धरून जमीन ताब्यात घेण्याचा बेकायदेशीर प्रकार समोर आला आहे. या अन्यायप्रकरणी सर्व पिडित शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्त नवी मुंबई, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य, कोकण आयुक्त, लोकायुक्त, मानवी हक्क आयोग, ईडी, मा. उच्च न्यायालय आदी ठिकाणी पत्रव्यवहार देखील केला आहे.

विवेक पाटील यांच्याकडून जमीन संपादनासाठी वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यांच्या दबावाखाली येऊन उरण पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी वर्ग पिडित शेतकऱ्यांचा मानसिक छ्ळ करत असल्याचा आरोप गावठाण विस्तार चळवळीचे नेते राजाराम पाटील व ग्रामस्थांनी केला आहे. योग्य न्याय न मिळाल्यास शेवटी आमरण उपोषण करण्याचा निर्णय पिडित शेतकऱ्यांनी घेतला आहे. जमिनी विकत नसल्याने तसेच अज्ञानाचा फायदा घेत शेतकऱ्यांची कोणतेही चूक नसताना देखील जमीन संपादनासाठी भादवी कलम 141,447, 141, 145,147 149 अन्वये शेतकऱ्यांवर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. केवळ जमीन देत नाहीत म्हणून पोलीस प्रशासनातर्फे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या जमिनीत मातीचा भराव सुरु असतो. तहसीलदार किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हे काम सुरु आहे. त्यामुळे मोठी जुई गावातील पीडित शेतकरी संतप्त झाले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!