घन:श्याम कडू
उरण : आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यास सांगितलं आहे. ही तसं पाहायला गेलं तर नोटबंदी नसली तरी यामुळे अनेक व्यवसायिक आणि लोकांना धक्का बसला आहे. नोट बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला या नोट बदलता येणार नाही. त्यामुळे सर्वच व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या नोटा खर्च करत आहेत. अशातच उरणमधील काही व्यापारी वर्गाने दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंद केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची कोंडी होत असल्याने भीक नको पण कुत्रा आवर अशी गत झाली आहे.
उरणमधील व्यापारी वर्गाकडून सामान किंवा खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर २००० रुपयांची नोट दिल्यावर घेण्यास नकार दिला जात आहे. त्यात मोठमोठे व्यावसायिक आपल्याकडील २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आपल्याकडे असलेल्या कामगारांना पगार देताना सर्वच २००० रुपयांच्या नोटा देत असल्याचे समजते. कोणी नकार दिला तर पगार रखडवला जात आहे. मोठमोठे व्यावसायिका २००० रुपयांच्या नोटा अशा प्रकारे बदलून घेत आहेत.
२००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत या नोटा कायदेशीर चलनात असणार आहेत. ३० सप्टेंबरनंतर या नोटा बाद होणार आहेत. असे असतानाही उरणमध्ये २००० रुपयांच्या नोटा घेण्यास नकार दिला जात असल्याने व दुसरीकडे शेठ पगारात २००० रुपयांच्या नोटा देत असल्याने या नोटांचे काय करायचे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. तरी चलनात ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांची नोट घेण्याची सक्ती करावी, जे घेत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून केली जात आहे.