रायगड : मुंबईकडून कोकणात राजापूर येथे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. एसटीने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीमधील जवळपास सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. विनोद पांडुरंग तागडे (वय ३८) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
हा भीषण अपघात रायगड जिल्ह्यात गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला अपघाताचा काळा डाग लागला आहे. या सगळ्या जखमी प्रवाशांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात आज रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. माणगाव आणि गोरेगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदत करून जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, या भीषण अपघात एकूण ३० ते ३५ प्रवाशी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, असे आदेश लागू असले तरी बंदी नेमकी कोणासाठी? की यंदाच्या वर्षी केलेली अवजड वाहनांना बंदी हे केवळ घोषणा व आदेशानपुरतीच मर्यादित राहिली आहे. याला जबाबदार कोण असा सवाल आता कोकणातील गणेशभक्तांकडून विचारला जात आहे.
