संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन : मान्सून पूर्व तयारीचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे पितळ पहिल्याच पावसात उघडे झाले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात अनेक भागांसह ग्रामीण भागात गेल्या पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुर आहे.
मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी वीज वितरणात अडथळे येऊ नये, याकरिता महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीचे नियोजन आखण्यात येत असते. हे नियोजन दरवर्षी केले जाते, पण दरवर्षीच पावसाला सुरवात झाल्यानंतर वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार नवीन राहिलेले नाही. यंदा देखील तालुक्यातील वीज ग्राहकांना तब्बल पाच दिवस अडचणींना सामोरे जावे लागले. तरी देखील ‘महावितरण’च्या या कारभारात वर्षानुवर्षे सुधारणा करण्याचे नियोजन आखण्यात आलेले नाही.
दुरुस्ती केल्यानंतर देखील पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणारी आपत्कालीन व्यवस्था सोडविण्यासाठी हवी ती यंत्रणा ‘महावितरण’कडे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पहिल्याच पावसाने विजेचा खोळंबा झाल आहे. पुढे मान्सूनला सुरुवात झाल्यास वीज ग्राहकांना किती हाल सोसावे लागतील याच घेणं देणं अद्याप सबंधित प्रशासनाला नाही. परंतु, दोन दिवसांत सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने ‘महावितरण’चा बोजवारा उडविला.
प्रत्येक महिन्याला दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात येते. यात प्रामुख्याने तारांना अडणाऱ्या फांद्या छाटणे तसेच प्रत्येक यंत्रणांची तपासणी करण्यात येते. यासारख्या कामांचे नियोजन आखण्यात आले परंतु, अगदी पावसाची रिपरिप सुरू झाल्यानंतर देखील वीजपुरवठा खंडित झाल्याचा अनुभव वीज ग्राहकांना आला आहे. मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात यंदा वाढ झाली आहे.