रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश, साऊथ सह कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा
सलीम शेख
माणगाव : कोकण रेल्वे मार्गावरील दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव रेल्वे स्थानकावरून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ये-जा करतात. मात्र, येथील प्रवाशांना या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने या गाड्यांचा काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे प्रवासी वर्गातून प्रचंड नाराजी पसरली होती. माणगाव हे दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जवळपासच्या अनेक तालुक्यातून या रेल्वे स्थानकातून अनेक नागरिक प्रवास करतात. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने विविध सुधारणा केल्या असून या मार्गावरून साऊथ सह विविध राज्यात एक्सप्रेस रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. मात्र येथे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत माणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने लांब पल्याच्या कांही एक्सप्रेस गाड्यांना माणगावात थांबा दिल्याने प्रवाशातून आनंद व्यक्त होत आहे.
माणगाव येथून जवळच महाड औद्योगिक क्षेत्र, विळे भागाड औद्योगिक क्षेत्र असून छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ले ही राजधानी जवळच आहे. नजीकच्या काळात येवू घातलेला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर, आंतरराष्ट्रीय दिघी पोर्ट त्याचबरोबर समुद्र किनारपट्टी यामुळे पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक, व्यापारी यासह अनेक प्रवासी नागरिक माणगाव रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. मात्र, या एक्सप्रेस रेल्वे थांबत नसल्याने प्रवाशी तीव्र संताप व्यक्त करीत होते. याबाबत गेल्या अनेक वर्षापासून माणगाव रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात यासाठी निवेदने देण्यात आली. अखेर या निवेदनाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाडी नं. १६३३३ / १६३३४ तिरुअनंतपुरम वेरावल एक्सप्रेस, १६३३५ / १६३३६ नागरकोईल गांधीधाम एक्सप्रेस आणि १९२५९ / १९२६० भावनगर कोचुवेली एक्सप्रेस या गाड्यांना माणगाव येथे थांबे देण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाने अधिसूचना काढली असून याची अंमलबजावणी दि. १९ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रवासी वर्गांना दिलासा मिळाला असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जैन यांनी केले आहे.