अमूलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यातील सारळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रोळी गावचा स्मशानभूमीचा प्रश्न मागील काही वर्षापासून भिजत घोंगड होऊन पडला आहे. याबाबत म्हात्रोळी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्ते ग्रामस्थ यांची भेट घेत तीन दिवसांत स्थळ पाहणी करण्याचे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत दिले आहे.
म्हात्रोळी गावासाठी सारळ ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. 177, जुना गट नं. 260, क्षेत्र 0.07.00 हे.आर. स्मशानभूमीसाठी राखीव आहे. परंतु या राखीव जागेत स्मशान चौथरा बांधण्यासाठी शासनाकडून लेखी परवानगी व पोलीस संरक्षण मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला आमरण उपोषण करावे लागणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. म्हात्रोळी हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. गावात एखाद्याचे निधन झाले तर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 3 कि.मी. अंतरावरील सारळ स्मशानभूमीत चालत जावे लागते. मागील अनेक वर्षापासून म्हात्रोळी ग्रामस्थ सारळ पुलावर अंत्यसंस्कार करीत आले आहेत. दिवसेंदिवस एवढे लाबं अंतर चालत जाणे आता शक्य होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे हे आवश्यक आहे. त्यामुळे म्हात्रोळी ग्रामस्थांची मागणी अवास्तव नाही, असे सांगून स्मशानभूमीचा चौथरा बांधण्यासाठी सारळ ग्रामपंचायतीने यापूर्वी ठराव मंजूर केला आहे. सातबाऱ्यावरही चौथऱ्यासाठी राखीव अशी नोंद आहे. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीचा चौथरा बांधण्याचा खर्च ग्रामस्थ करण्यास तयार आहेत. परंतु स्मशानभूमीचा चौथरा बांधताना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाची लेखी परवानगी अपेक्षित आहे. त्याबरोबरच पोलीस संरक्षणही आवश्यक आहे. मात्र अद्याप शासनाने आपल्या मागणीची कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उपोषण आंदोलन करावे लागत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले होते. त्यानुसार आज दिनांक 19 जून20203 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ग्रामस्थ उपोषणास बसले होते.
आमदार महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत त्यांना तीन दिवसांत स्थळ पाहणीचे आश्वासन दिले आहे. म्हात्रोळी ग्रामस्थांच्या उपोषणकर्त्या ग्रामस्थांना समाज क्रांती संघटनेने पाठिंबा दिला होता.