• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शासनाच्या उदासीन धोरणामुळे उरण तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचं काम रखडलं!

ByEditor

Dec 13, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या माध्यमातून सन २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वेश्वी सह इतर ग्रामपंचायत हद्दीत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु, शासनाच्या उदासीन धोरणामुळे सदरच्या योजनांच काम रखडलेल्या स्थितीत पडून राहिले आहे. तसेच हर घर जल योजना “जल जीवन मिशन” या ही योजना ठप्प पडून राहिल्या आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर जल’ कनेक्शन या २०२४ च्या संकल्पनेला तडा जाणार अशी चर्चा सध्या जनमाणसात व्यक्त केली जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावा गावातील नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हर घर जल योजना ” जल जीवन मिशन”या संकल्पनेचा मागोवा घेत मोठ्या थाटामाटात आदिवासी वाडी बरोबर खेडेगावात पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभ केला.परंतु रायगड जिल्ह्यातील प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे उरण तालुक्यातील अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना धूळ खात पडून राहिल्या आहेत.त्यात वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमानंर्गत सन २०१८-१९ या वर्षात सुमारे ६८ लाख ३४ हजार ०६४ रुपये खर्चाची वेश्वी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याचा निर्णय ग्रामीण पाणी पुरवठा राजिप उपविभाग पनवेल यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आला.परंतु सदर योजनेचा ठेका घेणारा ठेकेदार हा अर्धवट काम सोडून गेल्याने आज सदर योजनेचे काम अर्धवट स्थितीत पडून राहिल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत आहे.तरी या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी वेश्वी गावातील रहिवासी करत आहेत.

त्यातच उरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लागले आहे. मात्र वेश्वी ग्रामपंचायतप्रमाणे बांधपाडा, विंधणे, चिरनेर सह तालुक्यातील इतर ग्रामपंचायत हद्दीतील ‘हर घर जल योजना’ ‘जल जीवन मिशन’ या पाणी पुरवठा योजनांचे काम निधी उपलब्ध होऊन सुद्धा रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या डोळेझाक कारभारामुळे रेंगाळत पडलेले आहे. एकंदरीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर नल कनेक्शन या सन २०२४ जल जीवन मिशन संकल्पनेला तडा जातो की काय? अशी शंका जनमानसात सध्या व्यक्त केली जात आहे. तरी उरणचे आमदार महेश बालदी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वत: जातीने लक्ष घालावे अशी मागणी महिला वर्ग करीत आहेत.

रायगड जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभाग वरिष्ठ अभियंता संजय वैगूरलेकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी उरण तालुक्यातील पाणी पुरवठा योजना संदर्भात भटेश चव्हाण हे काम पाहत आहेत असे सांगितले.

उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. चिरनेर गावातील पाणी पुरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. फुंडे ग्रामपंचायतीचे काम पुर्ण झाले आहे. तर बांधपाडा विंधणे येथील कामे सुरू आहेत. उर्वरीत ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा योजनांची प्रक्रिया सुरू आहे

-भटेश चव्हाण
पाणी पुरवठा, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग उरण-पनवेल

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!