• शहरातील सतरा रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव
• रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मिलिंद माने
महाड : ऐतिहासिक महाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि जोड रस्त्यांवर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाळ्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात भरले गेले होते. मात्र, अवघ्या दोनच आठवड्यात या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आणि पावसाळ्यानंतर दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी देखील वाहनचालकांना खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असून आजही ही स्थिती जैसे थे असून हे खड्डे भरले जावे अशी मागणी नागरिक करत आहेत. खड्डेमुक्त रस्त्यांची महाडकर नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प बसले आहे.

कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड शहराला ऐतिहासिक महत्व आहे. अशा ऐतिहासिक शहराचा कारभार मागील वर्षभरापासून प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र, महाड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या प्रमुख आणि जोड रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. महाड शहरातील मुख्य रस्ते आणि जोड रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले असले तरी देखभाल दुरुस्ती न झाल्याने या रस्त्यांवर महाकाय जीवघेणे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी नळ जोडणीसाठी खोदलेले खड्डे जैसे थे आहेत. नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता मनाला वाटेल तसे प्रत्येकजण मुख्य रस्ते, जोड रस्त्यावर रात्रीच्या सुमारास नळ जोडण्यासाठी रस्ते खणून पाईप टाकण्याचा उपद्व्याप करीत आहेत.

महाड शहरात प्रवेश करण्यासाठी केंबूर्ली, चांभार खिंड, शेडाव नाका, नाते खिंड. दादली पूल येथून रस्ते आहेत. यातील केंबूर्ली येथून गांधारी पुलाजवळ असलेला रस्ता हा यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता. आता हा रस्ता महाड नगरपालिकेकडे हस्तांतरित झाला आहे. असे असले तरी आजतागायत या रस्त्यावर दुरुस्ती झालेली नाही. यामुळे केंबुर्लीपासून गांधारी पुलापर्यंत प्रचंड जीवघेणे खड्डे पडले आहेत. यापैकी नातेखिंड ते दस्तुरी नाका आणि शेडाव नाका ते नवे नगर हे दोन रस्ते सुस्थितीत आहेत.
महाड शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मार्ग, महात्मा गांधी मार्ग, मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दादली पुल, दादली पुल ते गवळ आळी, दादली पूल ते विरेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय व स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता, शासकीय विश्रामगृह, विरेश्वर मंदिर अशी ऐतिहासिक स्थळे असताना या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व रुग्णवाहिकेतील रुग्णांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच कोटेश्वरी ते पंचायत समिती, काकर तळे मोहल्ला ते भिलारे मैदान आदी रस्त्यांवर पडलेले खड्डे गेली अनेक महिने भरले गेलेले नसल्याने वाहनचालकांना तसेच दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगरपालिका इमारती समोरच रस्त्याला खड्डे पडले आहेत. हीच स्थिती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दस्तुरी नाका तसेच दस्तुरी नाक्यापासून डॉ. म्हामुणकर हॉस्पिटलपर्यंत काँक्रिट रस्त्यातील लोखंडी रॉड बाहेर आले आहेत. गेली कित्येक महिने महाडमधील नागरिक खड्डे भरण्याबाबत वारंवार मागणी करत आहेत. महाड नगरपालिकेच्या प्रशासनाला खड्डे भरण्याकरता मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून आजी-माजी नगरसेवकांपासून शहरातील भाजी विक्रेते आणि प्रतिष्ठित नागरिकांमध्ये ऐकण्यास मिळत आहे. मात्र, याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
महाड नगरपालिकेकडून खड्डे भरण्यासाठी आणि नवीन रस्त्यांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र, हे प्रस्ताव मंजुरीला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसटी स्टँड ते नवे नगर, शेडाव रस्ता ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, सर्वे नंबर ६६ ते सर्वे नंबर ७१ पर्यंत नवीन काँक्रीट रस्ता, सर्वे नंबर ८६ ते सर्वे नंबर ७१ पर्यंत नवीन काँक्रीट रस्ता, दस्तुरी नाका ते राष्ट्रीय महामार्ग काँक्रीट रस्ता व नाला बांधकाम, दस्तुरी नाका ते राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरण, मारुती मंदिर ते सर्वे नंबर १०१ मारुती मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग, दस्तुरी नाका ते लोकमान्य हनुमान व्यायाम शाळा, कोटेश्वरी तळे पूर्व बाजू सर्वे नंबर ९७ ते दक्षिण बाजू नवीन पर्यंत काँक्रिटीकरण, कोटेश्वरी तळे सर्वे नंबर १०० ते दक्षिण बाजूपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण, सर्वे नंबर ९४ ते सर्वे नंबर ७५ सर्वे नंबर ५४ ते सर्वे नंबर ७३ पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, शेडाव नाका ते सर्वे नंबर ८५ नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता हनुमान व्यायाम शाळा ते एसटी स्टँड हनुमान व्यायाम शाळा ते एसटी स्टँड अशा रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
महाड शहरातील अनेक रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज
महाड शहरातील लोकसंख्या इमारतींची संख्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पूर्वीच्या शहररचना नकाशाप्रमाणे आता रस्ते अरुंद पडत आहेत. त्यातच रस्त्यांवर होणारे अतिक्रमण, विक्रेत्यांची गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे. यामुळे छत्रपती शिवाजी चौक ते चवदार तळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दादली पुलापर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी बस स्थानक, काकर तळेपासून महामार्गाकडे जाणारा रस्ता अशा अनेक रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. महाड शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग तसेच महात्मा गांधी मार्ग या दोन मार्गांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते यामुळे हे दोन्ही रस्ते दुभाजकांसह रुंदीकरण होणे काळाची गरज आहे.
वाहतूक कोंडीला नगरपालिका कारणीभूत?
महाड शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या वाहतूक कोंडीमुळे व अनेक दुकानदार नगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील व्यावसायिक गाळेधारक व खाजगी दुकानदार मूळ दुकान सोडून रस्त्यावर आपला संसार थाटत असल्याने व दुकानाच्या पाट्या रस्त्याच्या बरोबरीला लावत असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या फळ विक्रेते व भाजीपाल्या विक्रेत्यांच्या हातगाड्या व बेकायदेशीर हॉटेलचालक ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतील अशा पार्किंग करत असल्याने तसेच महाड शहरातील स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसी बँक, सारस्वत बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, अण्णासाहेब सावंत बँक व अनेक खाजगी पतसंस्था तसेच शहरातील सर्वच वैद्यकीय दवाखाने यांना कोणत्याही प्रकारचे स्वतःचे पार्किंग नसल्याने रस्त्यावर गाड्या लावून वाहतूक कोंडीला निमंत्रण देतात. मात्र, ना नगरपालिका यावर लक्ष केंद्रित करत ना वाहतूक शाखा कोणतीही कारवाई करत. त्यामुळे या बेशिस्त वाहनांवर कोण कारवाई करणार? असा प्रश्न महाड शहरात निर्माण झाला आहे. कारवाई करायला गेले तर राजकीय दबाव येत असल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.