• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पर्यटकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे विरजण!

ByEditor

Dec 25, 2023

सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक रायगडात दाखल, माणगावात पोलिसांची दमछाक

सलीम शेख
माणगाव :
गेली तीन दिवस सलग सुट्ट्या त्यातच नाताळ आणि थर्टी फस्टची फोडणी यामुळे अखंड महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय व पर्यटनस्थळे हाउस फुल झाली आहेत. आज तिसरा दिवस सुट्टीचा असून ही अनेक पर्यटकांचे थवे या निसर्गाचा मुक्तपणें आस्वाद घेण्यासाठी व टेन्शन फ्री कोंडलेल्या मनाला मोकळी वाट कांही काळासाठी करून देण्यासाठी रायगडात विविध ठिकाणी दाखल होत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर पुणे दिघी मार्गावरील माणगाव हे ठिकाण महत्वाचे असून या मार्गावर गेली तीन दिवस सतत वाहतुकीची कोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची झोप उडाली असून चांगलीच दमछाक झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचे शहर म्हणून माणगावकडे पाहिले जाते. या शहरातून तळ कोकणात जाणारा महामार्ग आहे. मुंबई कडून कोकणात व तळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशी, पर्यटकांना मुंबई गोवा महामार्ग जवळचा व सोयीस्कररित्या सोपा वाटतो. दुसरा मार्ग पुणे कडून आहे मात्र तो लांब पडत असल्यामुळे अनेक प्रवासी, पर्यटक त्यामार्गे प्रवास सहसा करीत नाहीत. माणगाव बाजारपेठेतून हा मार्ग जात असलेमुळे दिवसेंदिवस वाहतूक वाढली आहे. पर्यटक मोठया प्रमाणात कोकणात वाढला असला तरी रस्ते मात्र गेली अनेक वर्षाचे जैसे थेच आहेत. त्यातच रस्तेच्या कडेला असणारी टपऱ्या, छोटे उद्योजक आणि महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, पर्यटक ही आपली वाहने रस्त्यालगत उभी करून बाजारात लहान मोठी खरेदी करीत असतात. त्यामुळे मुंबई गोवा तसेच दिघी पुणे मार्गावरून प्रवास करणारे वाहनांना अडथळा निर्माण होतो.

शनिवार, रविवार व नाताळ तसेच दत्त जयंती अशा लागून सुट्ट्या त्यातच चार दिवसांवर थर्टीफस्ट आल्यामुळे पर्यटकांनी आपली कूच रायगड सह संपूर्ण कोकणाकडे मोठया प्रमाणात केली आहे. मुंबई, ठाणें, वसई, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून पर्यटक, प्रवासी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर अजूनही प्रवासी प्रवासातच अडकले आहेत. या मोठया प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे इथल्या वाहतूक कोंडीवर मोठया प्रमाणात परिणाम झाला असून तासंतास प्रवासात रस्त्यावरच पर्यटक, प्रवाशांना अडवून पडावे लागले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची ही चांगलीच दमछाक होऊन तारांबळ उडाली आहे. त्या नंतरही हे पर्यटक परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर ही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार असून पर्यटक या रस्त्यांनी प्रवास करण्यास उदासीन झाले असून तीव्र संताप व्यक्त करीत असून याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनांनी रुंद रस्ते, पर्यायी मार्ग व सुविधा उभाराव्यात असी मागणी होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!