• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच पाणी टंचाई?

ByEditor

Jan 1, 2024

घन:श्याम कडू
उरण :
चाणजे ग्रामपंचायतीचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतीची १० कोटी रुपयांच्या वरती पाण्याची थकबाकी असल्यानेच ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. याबाबत लवकरच ग्रामस्थ येत्या २६ जानेवारीला जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे समजते.

गेली अनेक महिन्यापासून चाणजे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी उरण तहसील कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर पाणी टंचाईवर मार्ग निघेल असे ग्रामस्थांना वाटत होते. परंतु यावर मार्ग निघण्याऐवजी परिस्थिती आणखीन बिकट बनत चालली आहे. ग्रामपंचायत मधील सत्ताधारी पाणी प्रश्नाऐवजी आपली आर्थिक टंचाई कशी दूर होईल याकडे अधिक लक्ष देत असल्याने त्यांना जनतेच्या पाणी प्रश्नाचे सोयरसुतक दिसत नाही.

चाणजे ग्रामपंचायतमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सुरू होऊन चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सरपंचाची ही याप्रकरणी चौकशी सुरू आहे. परंतु तरीही सदर भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे दिसते. गेली पाच ते सहा महिन्यांपासून या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असूनही यावर ठोस कारवाई करणे आवश्यक असताना ही जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी आर्थिक हितसबंधामुळे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

ग्रामपंचायतला विकासासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कोणाच्या घशात जातो असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवून भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आली आहे. या भ्रष्टाचाराला ग्रामपंचायत सत्ताधारी जबादार असतानाही शासकीय यंत्रणेने थातूरमातूर कारवाईचा बडगा उगारत ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित केले आहे. त्याला जवळपास पाच सहा महिन्यांचा अवधी उलटूनही पुढील कारवाईस विलंब केला जात आहे. यावरून सदर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. अन्यथा पुढील कारवाई कधीच झाली असती असे ग्रामस्थ सांगतात.

गेली अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना चाणजे ग्रामस्थांना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी उरण तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात आला होता. त्यानंतर पाणी प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास ग्रामस्थांना वाटत होता. परंतु परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यात १० कोटींच्या वरती पाणी थकबाकी असल्याने पाणी पुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित होतो. ग्रामपंचायतमधील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार व पाणी टंचाई सामना येथील जनतेला करावा लागत असतानाही येथील विरोधक व जनता याबाबत कोणतीच ठोस किंवा आक्रमक भूमिका घेताना दिसंत नाही. त्यामुळेच चाणजे ग्रामपंचायतच्या समस्या मार्गी लागत नसल्याचे बोलले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!