अनंत नारंगीकर
उरण : रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक सोमवारी (दि. १) नवी मुंबई परिसरातील रस्त्यावर उतरले होते. मात्र जेएनपीए बंदरातील हजारो वाहन चालक हे सदर कायद्यामुळे भयभीत झाले असून सदर कायदा हा रद्द करावा या आपल्या मागणीसाठी बहुतांश चालकांनी आपली वाहने जागेवर उभी करून आपआपल्या घरात राहणे जास्त पसंत केले. एकंदरीत बंदर, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल असा कायदा करण्यात आला आहे. असा दावा करीत या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी नवी मुंबई परिसरातील वर्दळीचे मार्ग रोखून आंदोलन छेडले होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या कायद्यामुळे धास्तावलेल्या जेएनपीए बंदर परिसरातील हजारो वाहनचालकांनी हा कायदा रद्द करावा या आपल्या मागणीसाठी आपआपली वाहने जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर उभी करून घरीच राहणे पसंत केल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तर काही वाहनचालक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते.