वैशाली कडू
उरण : जून महिना संपत आला तरी पावसाने आपलं रौद्र रुप धारण केलेलं नाहीये. मे महिन्यात ज्याप्रमाणे उकाडा होता. त्याचपेक्षाही जून महिन्यातही उकाडा लागत आहे. राज्यात उद्यापासून पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परंतु उरणला उष्णतेची लाट कायम आहे. उरणमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
चक्रीवादळामुळे कोकणातील तापमान वाढले आहे. अलिबागमध्ये 35.6 अंश म्हणजे सरासरीपेक्षा 4.3 अंश अधिक तापमान नोंदले गेले आहे. गुरुवारी बंगालच्या उपसागरातील मान्सून शाखेचा प्रवास पुढे सुरू झाला. मात्र अरबी समुद्रातील शाखा अजूनही पुढे सरकलेली नाही. त्यामुळे कोकणातील उकाडा कायम आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कोकणासाठी उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यांची संख्या अधिक होती, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. उरणमध्ये उष्णतेच्या लाटेत जनतेला जीव नकोसा झाला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळते. तर काहीजण पासवसाला सुरुवात होण्याआधीच कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करीत आहेत.