गणेश मिरजनकर व प्रकाश भोबू यांचे कौतुक
संतोष रांजणकर
मुरूड : मुरूड एकदरा पुलावर पावसामुळे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी असलेले मार्ग बंद झाल्याने पुलावर पाणी तुंबत आहे. या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने पुलावरील साचलेले पावसाचे पाणी वाहून जात नाही. त्यामुळे स्थानिक पादचाऱ्यांना व वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी स्थानिक रहिवासी गणेश मिरजनकर व प्रकाश भोबू यांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून पुलावरील पाण्याचे मार्ग स्वच्छ केल्याने पुलावरील पावसाचे पाणी वाहून जाऊ लागले आहे. त्यामुळे सर्वत्र या दोघांचे कौतुक होत आहे.

सुमारे तीस वर्षांहून अधिक काळ या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत. या पुलाची होणारी डागडुजी बंद केली आहे. त्यामुळे या पुलाची पार दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलावर बांधकाम विभाग स्वच्छता करत असत. त्यावेळी पुलावरील साचलेली माती काढून पाणी वाहून जाण्याचे मार्ग मोकळे करायचे त्यामुळे पुलावर पावसाचे पाणी तुंबत नव्हते.

मागील तीस वर्षांहून अधिक काळ या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभाग स्वच्छता करत नसल्याने पुलावरील माती साचून पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाले होते. त्यात महावितरण व दुरसंचार विभागाने केबल पुलावर अंथरुन पाणी वाहून जाणारे मार्ग बंद केले आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरवून या पुलाची डागडुजी व स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी व वाहनचालकांनी केली आहे.