• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजनेमुळे मुरुड शहराला पाणी टंचाईस सामोरे जावे लागेल -मंगेश दांडेकर

ByEditor

Jun 26, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
आमदार महेंद्र दळवी यांनी नुकतेच मजगाव येथे आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. या योजनेमुळे मुरुड शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण आंबोली धरणाचे पाणी विविध विभागाला वाटप करण्यात आले असून त्यातच आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजनेसाठी १५ जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आंबोली धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होणार आहे. या योजनेपेक्षा वांद्रे धरण बांधल्यास त्या भागातील ग्रामपंचायतीची पाणीटंचाई कमी होणार आहे. धरण बांधण्यासाठी २५ कोटीचा खर्च येतो तर या योजनेसाठी ४४ कोटी खर्च येणार आहे. यासाठी आमदारांनी वांद्रे धरण बांधण्यासाठी गतिमान प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरुड तालुका अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

दांडेकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी दांडेकर आंबोली धरणाची सविस्तर माहिती देताना पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुरुड शहरप्रमुख आदेश दांडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक व माजी पाणी पुरवठा सभापती प्रमोद भायदे, नितीन पवार, सचिव विजय पैर, शहर अध्यक्ष विजय भोय, महिला तालुका अध्यक्ष ऍड. मृणाल खोत, माजी नगरसेविका प्रमिला माळी, काँग्रेस शहर अध्यक्ष नाना गुरव, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष इस्माईल शेख, मनीष माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत मंगेश दांडेकर यांनी आंबोली धरणातील पाण्याचे विश्लेषण करताना सांगितले कि, आंबोली धरणातील पाणी साठा हा ९.९६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणातील एकूण सिंचन साठा ५.१९८ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणातील पिण्यासाठी पाणी १.४२५ दशलक्ष घनमीटर, औद्योगिक वापरासाठी २.१८३ दशलक्ष घनमीटर, धरणातील पाण्याचे बाष्पीभवन ०.६९४ दशलक्ष घनमीटर, मुरुड नगरपरिषदेसाठी ०.८४९ दशलक्ष घनमीटर, कोस्ट गार्डसाठी ०.०५१ दशलक्ष घनमीटर, आगरदांडा येथे पिण्यासाठी ०.७३ दशलक्ष घनमीटर, औद्योगिक कारणासाठी १.१० दशलक्ष घनमीटर असा पाणीसाठा वापरला जाणार आहे. त्यातच आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजनेसाठी २.२२७ पाणीसाठा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणी संपूर्णतः आटणार आहे. मुरुड शहराला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जलसंपदा अधिकारी वर्गांनी आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजेबाबत आम्हाला सांगावे नांदगाव योजनेला पाणी दिल्यावर धरणात पाणी शिल्लक राहील काय व आमच्या ज्ञानात भर पडेल.

यावेळी दांडेकर यांनी मंजूर पाणी पुरवठा योजनेतील काही ग्रामपंचायतीना जल जीवन मिशन योजने अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा लाईन टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच पेय जल योजनेमधून सुद्धा पाणी पुरवठा केलेला आहे. स्वतंत्र योजना होऊन सुद्धा ग्रामपंचायतीना या योजनेचा मेंटेनंस करता आलेला नाही हि सत्य बाब असून वेळप्रसंगी वीजबिल न भरल्याने पाणी पुरवठा ठप्प झालेली अनेक उदाहरणे मुरुड तालुक्यात असल्याचे स्पष्टीकरण यावेळी दांडेकर यांनी दिले आहे.

रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे असताना त्यावेळी आंबोली धरणातून नांदगावपर्यंत पाणी पुरवठा पाईप लाईनद्वारे करण्याचा प्रस्ताव होता परंतु, त्यावेळच्या अधिकारी वर्गांनी सदरचे काम होऊ शकत नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला होता. अंतर जास्त असल्याने सदरची योजना यशस्वी होईलच असे नाही असे सुद्धा प्रतिपादन यावेळी दांडेकर यांनी केले. आम्ही आमचे म्हणणे इरिगेशन व एमजीपीला मांडणार असल्याचे दांडेकर यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद भायदे यांनी सांगितले कि, नांदगावला पाणी पुरवठा केल्याने धरणातील पाणीसाठा कमालीने कमी होणार असून भविष्यात मुरुड शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अधिकारी वर्गांनी आम्हाला सांगावे काय सत्य आहे. नांदगावला पाणी देऊन ते पण उपाशी व मुरुड शहर सुद्धा उपाशी राहता काम नये. पाण्याचे गणित अधिकार वर्गांनी स्पष्ट करण्याची मागणी यावेळी भायदे यांनी केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!