एक आगरी, लाखांना भारी, जय आगरी चा घुमला पनवेलमध्ये नाद
अनंत नारंगीकर
उरण : अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग यांचे दुसरे आगरीअस्मिता साहित्य संमेलन रविवार दि. २८ रोजी पनवेलमधील लोकनेते दि. बा. पाटील साहित्य नगरी, महात्मा ज्योतिबा फुले, आगरी समाज सभागृह येथे उत्साहात आणि आगरी शैलीत संपन्न झाले.
संमेलनाचे उद्घाटन डॉ. अविनाश पाटील यांचे हस्ते झाले. आगरी समाजाने संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गझलकार, ए. के. शेख, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, आदी मान्यवर उपस्थित होते. मंचावर सदर संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक श्री सुरेश भोपी , संस्थाध्यक्ष कैलास पिंगळे, कार्याध्यक्ष मीनल माळी,साहित्यिक म वा म्हात्रे, उपकार्याध्यक्ष चंद्रकांत कांडपिळे, कृष्णा जोशी , रमाकांत म्हात्रे, जयंत पाटील, डॉ शोभा पाटील, स्मिता वाजेकर, चंद्रकांत पाटील, सिने कलावन्त प्रज्ञा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. सनईच्या सुरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
दीपप्रज्वलन नंतर ओंकार स्वरूपा या भक्तिगीताने संमेलनाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास पिंगळे यांनी केले. यानंतर मंचावरील काही उपस्थितांची मार्गदर्शन पर भाषणे झाली.आगरी भाषेत बोला, आगरी पराक्रमी वीर आन..मान ठाकूर यांनी जिंकलेला वसईचा किल्ला, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील, ब्रिटिशांना हादरवून सोडणारा चिरनेरचा जंगल सत्याग्रह, याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे, आगरी नावात आग आहे. एक आगरी लाखाना भारी असेही सांगितले. अनेक साहित्यिक कागदावर लिहितात मात्र आगरी साहित्यिक काळजावर लिहितात असे उपस्थितांनी सांगितले. आगरी जातीत हुंडा घेत नाही आणि देत नाही हा आदर्श इतरांनी घ्यावा असेही सांगितले. संपूर्ण सभागृह जय आगरीच्या घोषणेने दुमदुमून गेले होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आगरी समाज बांधवांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच काही साहित्यिकांच्या पुस्तकांचे यावेळेस प्रकाशन करण्यात आले.
परिसंवादात के. एम. मढवी यांनी आगरी समाजाचा प्राचीन इतिहास सांगितला. तर सर्वेश तरे यांनी टीव्ही सीरिअलमध्ये आगरी माणूस बेवडा आणि व्यसनी दाखवत असल्याबद्दल घणाघाती टीका केली. पराक्रमी, हुशार ही दुसरी बाजू पण दाखवा तसेच अंगावर भरपूर दागिने घालणारी आगरी स्त्री जरूर दाखवा पण अभिलाषा म्हात्रे सारख्या आगरी मुली आणि स्त्रीया पण दाखवा असे त्यांनी निर्मात्यांना आवाहन केले.
अवनी पाटील, संगीता पाटील, मनस्वी माळी यांनी धवला गाऊन आगरी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविले. यानंतर जवळपास ४० कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कवी मिलिंद खारपाटील यांची आगरी माणसाचं अस्तित्व ही कविता अनेकांना भावली. या आगरी साहित्य संमेलनास पनवेल, उरण, पेण , अलिबाग, रोहा, कर्जत, ठाणे, कल्याण, भिवंडीहून शेकडो आगरी बंधू भगिनी आले होते. साहित्य संमेलनाचे सुत्रसंचालन नम्रता पाटील आणि जीविता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप कवी अरुण द. म्हात्रे यांच्या पसायदानाने झाला. संमेलनाध्यक्ष सुरेश भोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन यशस्वी झाले.