• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली!

ByEditor

Feb 5, 2024

साहेब, पाण्यावाचून कसं राहायचं? म्हसळा तालुक्यातील मेंदडी आदिवासी वाडीवरील महिलांची विचारणा, जलसंधारणाची गरज

महिना उलटून गेला, तरी पाणीच नाही; बोअरवेल बंद तर विहीर आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण

जलजीवन योजनेचे ‘हर घर जल’ पोहोचलेच नाही, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित

गणेश प्रभाळे
दिघी :
म्हसळा तालुक्यातील मेंदडी गाव आजही तहानलेले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून ‘हर घर जल योजना‘ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मेंदडी आदिवासी वाडीवर येथील कोणत्याच योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने, या योजनेतून नक्की अधिकाऱ्यांना फायदा झाला की कंत्राटदाराला हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

दिघी – पुणे महामार्गाची निर्मिती झालेल्या मार्गावरच हे गाव आहे. या मेंदडी आदिवासी वाडीवर साधारण 86 कुटुंबातील 367 लोक राहातात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासी वाडीवर पाणीटंचाई सुरू झाली आहे. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहचत नसल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेऊन विविध विकास कामे करण्यात आली. आजही येथील जनतेला ते वरदान ठरत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांचा योजना राबवण्यात आल्या. मात्र, या आदिवासीवाडी शेजारी एक धरण असून या धरणाचे पाणी आदिवासी बांधवाना मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊन सुद्धा येथील नागरिक पाण्यापासून तहानलेले आहेत. शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली तरी विकासापासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.

विहिर कोरडी अन बोअरवेल बंद, कसं काय ‘हर घर जल’ पोहचणार?

येथील सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी असून स्वदेशफाउंडेशन मार्फत बांधण्यात आलेलं दोन बोअरवेल बिघाड होऊन बंद अवस्थेत आहे. जलजीवन योजनेचे रखडलेले काम अपूर्ण असल्याने सद्या या गावात पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थ रानातील झऱ्यातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक आहे. दरवर्षीच्या परंपरे नुसार राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा क्षुल्लक कारणांमुळे मेंदडी आदिवासी वाडीवरील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.

चार योजनांतून हंडाभर पाणी नाही
शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), कृषी विभागाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, अशा योजनाचा फारसा फरक तालुक्यातील गावांना पडला नाही. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात जल संधारण तसेच जल संवर्धन सारख्या कायम व दूरदृष्टी उपायांची गरज आहे. प्रशासन बोअरवेल व विंधन विहिरी प्रस्तावित करण्याचे कागद घोडे नाचवते. कधी कधी विंधन विहिरीस पाणी न लागल्याने खर्च ही वाया जातो. याच चित्र सद्या मेंदडी आदिवासी वाडीवर दिसत आहे.

गेल्या महिन्यापासून गावात पिण्यासाठी पाणी नाही. पाणी समस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे दिवसाची मजुरी बुडते. पाण्याच्या समस्येसाठी संपर्क करण्यात आला. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही.

-काशिनाथ वाघमारे,
रहिवासी मेंदडी.

मेंदडी आदिवासी वाडीवरील पाण्याची समस्या असल्याची माहिती ग्रामपंचायतपर्यंत आली नाही. माहिती घेऊन समस्या सोडवण्यात येईल.
-राजश्री कांबळे,
मेंदडी सरपंच.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!