घाटातील धबधबे ओस; धोकादायक ठिकाणी मनाई आदेश जारी
सलीम शेख
माणगाव : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदऱ्यातील धबधब्यांचे, डोंगर दरीत फिरण्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे. अनेकजण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत पर्यटन करतात. यावर्षी मात्र जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनाला फटका बसून निसेरगप्रेमिंचा हिरमोड होतो आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात डोंगरावरून पडणारे धबधबे, धरण, नदी परिसर हे पावसाळी दिवसात पर्यटनाचे केंद्र ठरतात. जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक पर्यटक पावसाळी दिवसांचा आनंद घेण्यासाठी खास रायगड जिल्ह्यात येतात. यातून स्थानिकांना रोजगार मिळतो. पर्यटनाला चालना मिळते. यावर्षी मात्र जून महिना संपायला आला तरी पाऊस सुरू न झाल्याने धबधबे, ओहोळ कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमी नाराज असून चांगल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाळा लांबल्याने जून महिन्यापासून पर्यटन क्षेत्रात सुरू होणारा हंगाम बंद असून पर्टकांसह, लहान व्यवसायिकांना याचा फटका बसत आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाट हा रायगडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरते. ताम्हिणी घाटातील नैसर्गिक रचनेमुळे पावसाळ्यात या ठिकाणी सुंदर असे परिसर व मोठमोठाले धबधबे निर्माण होतात. त्यामुळे ताम्हिणी घाट हा पावसाळी पर्यटनाची पर्यटकांची मोठी पसंती असते. पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने स्थानिक लोकांना विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध होतो. चहा टपरी, मके विक्री इत्यादी इत्यादी खाद्यपयोगी वस्तूंना या वेळी चांगली मागणी असते व अनेकजणांना या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो. यावर्षी मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने पर्यटकांनी धबधब्याकडे पाठ फिरवली आहे यामुळे पावसाळी पर्यटनाला मोठा फटका बसत असून स्थानिकांची रोजीरोटी बुडत आहे.
पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने दुर्गम भागात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश माणगाव विभागीय अधिकारी उमेश बिरारी यांनी लागू केले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२३ या दिवसांत मनाई आदेश जारी केला आहे. तसेच पावसाळी दिवसांत धबधबे परिसरामध्ये मद्यपान करणे , मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे , मद्य बाळगणे, अनधिकृत मद्यविक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे , पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी धबधबे ,कठडे ,धोकादायक वळणे आधी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चितरीकरण करणे अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. सिक्रेट पॉईंट , ताम्हिणी घाट ,दुर्गम धबधबे घाट इत्यादी ठिकाणी पर्यटन स्थळे मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.
पावसाळी दिवसात घाटात धबधब्यामुळे चांगली गर्दी असते.अनेक स्थानिक यावेळी विविध प्रकारचा व्यवसाय करून रोजगार मिळवितात. यातून चांगली कमाई होते. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने धबधब्याकडे पर्यटन बंद असून स्थानिकांना मिळणारा हक्काचा रोजगार बंद आहे.
नितिन बडे, सामाजिक कार्यकर्ता.
पावसाळ्यात पर्यटनाला जाणे हा मोठा आनंदाचा विषय असतो. धबधबे, हिरवे रान यामुळे मनाला प्रसन्नता मिळते .अल्हाददायक वातावरण असल्यामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणातील विविध ठिकाणी वारंवार भेट देत असतात .यावर्षी पाऊस लांबल्यामुळे पर्यटनाचा आनंद घेता येत नाही.
नयन पोटले, निसर्ग प्रेमी