अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील अनेक गावांमध्ये १८ जुलै २०२३ रोजी पुराचे पाणी शिरुन रहिवाशी शेतकऱ्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून आयसीआयसीआय बँकेत जमा होऊनही बँकेकडून नुकसान भरपाई देण्यास चालढकलपणा होत असल्याने नुकसानग्रस्त रहिवाशी शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, विंधणे, दिघोडे, वेश्वी,जासई, कळंबुसरे, कोप्रोली, खोपटा, वशेणी, सारडे, करळ, सोनारी, पागोटे, नवघर, भेंडखळ, बोकडविरा, नागाव, चाणजे, केगाव, जसखार सारख्या इतर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रहिवाशी शेतकऱ्यांच्या घरात १८ जुलै २०२३ रोजी पुराचे पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या माध्यमातून शासनस्तरावर सातत्याने करण्यात आली होती. शासनाने सदर मागणीची दखल घेऊन शासन स्तरावरुन आयसीआयसीआय बँकेकडे नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकांनी काही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, उर्वरित गावोगावच्या नुकसानग्रस्त रहिवाशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास चालढकल करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील नुकसानग्रस्त रहिवाशी शेतकऱ्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल संतापाची लाट उसळत आहे.
आज जवळपास सात महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही नुकसानग्रस्त रहिवाशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी. यासाठी सातत्याने मागणी केली आहे. न पेक्षा नुकसानग्रस्त रहिवाशी शेतकरी आंदोलन उभारतील.
-प्रितम म्हात्रे
नुकसानग्रस्त रहिवाशी, सारडे ग्रामपंचायत
उरण तालुक्यातील नुकसानग्रस्त रहिवाशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी यासंदर्भात आयसीआयसीआय बँक जेएनपीए उरण शाखेला आदेश दिले आहेत.
-डॉ. उध्दव कदम
तहसीलदार, उरण
आयसीआयसीआय बँकेकडे नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून जमा झाली असून त्याचे वितरण करण्यात येत आहे.
-आयसीआयसीआय बँक,
जेएनपीए उरण