घनःश्याम कडू
उरण : तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे वास्तव समोर येऊनही उरण पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी तो उघड करण्याऐवजी त्यांनी खोटे अहवाल देऊन पाठराखण केल्याचे दिसत आहे. ग्रामविस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) विनोद मिंडे यांची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली असता ती फसवी व धूळफेक करणारी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी मुख्यालय माणगाव असल्याचे दाखविले आहे. तर ज्याठिकाणी आजतागायत एसटी बस गेली नाही त्याठिकाणी मिंडे यांनी एसटी प्रवासाचे साधन दाखविले आहे, तर 24 सालामधील महिना उजाडण्याच्या आधीच त्याची माहिती देण्याचे काम माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करून मिंडे हे काम करीत असल्याचे उघड होत आहे. त्यामध्ये ते कार्यालयीन कामासाठी स्वतःच्या मालकीच्या चारचाकी गाडीचा वापर करीत आहेत. तसेच त्यांचे सध्या वास्तव्य पनवेल येथे असून ते मुख्यालय माणगाव नमूद केले आहे. तरी याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी मुख्यमंत्री कक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
ग्रामविस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्यावर कोर्लई ग्रामपंचायतमधील गैरकारभाराविरुद्ध गुन्हा दाखल असतानाही आजतागायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अन्वये तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक असतानाही त्यांच्याकडे उरणचा अधिक भार देण्यात आला आहे. तसेच त्यांना उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. तरी या सर्व प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार तक्रारदारांनी चव्हाट्यावर आणूनही व वरिष्ठ कार्यालयाकडून उरण पंचायत समितीला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देऊनही उरण पंचायत समिती कार्यालयाकडून कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. तक्रारदारांनी काही सबळ पुरावे देऊनही अधिकारी वर्ग तक्रारदारांना चौकशी सुरू असल्याचे थातुरमातुर उत्तर देत वेळ मारून नेत आहेत. मात्र, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांची मात्र अधिकारी वर्गाबरोबर शासकीय कार्यालयात उठबस असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावरून अधिकारी वर्ग भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसते.
उरण पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी (पंचायत) यांची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली असता दिलेल्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मिंडे यांनी त्यांचे मुख्यालय माणगाव येथे असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात मुख्यालय ठिकाणी वास्तव्यास असणे नियमाने बंधनकारक असतानाही सध्या ते पनवेल येथील सुकापूर येथे वास्तव्यास आहेत. तसेच त्यांनी ग्रामपंचायत भेटीसाठी एसटी बसचा वापर केल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये केगाव, नागाव, चाणजे, म्हातवली आदी ठिकाणी प्रवासाचे साधन एसटी बस दाखविले आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आजतागायत एसटी बस कधीच गेलेली नाही. सदर प्रवासाचे त्यांनी बस तिकिटे जोडलेली नाहीत. मात्र, हे स्वतःच्या मालकीच्या गाडीने प्रवास करीत असतानाही एसटी बस प्रवासाचे साधन दाखविले जात आहे. तर काही ठिकाणी 24 सालामधील महिना उजाडण्याच्या आधीच ग्रामपंचायत कार्यालय भेटी असे नमूद केले आहे. यावरून मिंडे हे शासनाची फसवणूक करून गैरफायदा घेत असल्याचे उघड होते. तरीही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकावला आहे.
शासकीय जबाबदार अधिकारीच जर अशी खोटी व धूळफेक करणारी माहिती देत असतील तर तक्रारदारांना न्याय मिळण्याऐवजी भ्रष्टाचाराची पाठराखण होईल असा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. याबाबत तक्रारदारांनी मुख्यमंत्री कक्ष व मुख्यकार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाबतचे तक्रारदारांनी पुरावे देऊनही अधिकारी वर्गानी याची कोणतीही सखोल चौकशी न करता भ्रष्टाचार करणार्यांना क्लीन चिट देऊन अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. या विरोधात तक्रारदारांना न्याय मिळत नसल्याने ते लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते.