घन:श्याम कडू
उरण : आपण फेसबुक वापरत असाल तर सावधान…! फेसबुकच्या मेसेंजरमधून आपल्याच परिचयाच्या व्यक्तीच्या नावाने आपल्याशी संपर्क साधून आपल्याला बेमालूमपणे लुटलं जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या चारसोबीशी करणाऱ्या टोळीकडून आपल्याच परिचयाच्या व्यक्तीच्या हॅक केलेल्या फेसबुक अकाऊंटवरून आपल्याला सुरुवातीला मेसेंजरद्वारे बोलतं केलं जात आहे. आपण त्यांच्याशी आपला परिचयाचा व्यक्ती समजून चॅटिंग करायला सुरुवात केलीत की, आपण फसलात म्हणून समजा अशी काही प्रकरणे समोर आली आहेत.
आपल्याशी चॅटिंग करणारा भामटा आपल्याला त्याचा मित्र असलेल्या सीआरपीएफच्या जवानाची पुण्याहून काश्मीरला बदली झाली असल्याने तो त्याच्या घरातील फर्निचर विकत असल्याचे सांगितले जाते. ही चॅटिंग सुरू असतानाच अनोळखी अशा कॅप्टन संतोष कुमार नामक इसमाचा आपल्याला फोन येतो आणि आपल्या चॅटिंग करणाऱ्या मित्राचे नाव घेऊन ते मीटिंगमध्ये आहेत तुमच्याशी बोलू शकत नाहीत असे सांगून तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे च्या माध्यमातून हजारो रुपये पाठवायला सांगितले जातात. उत्तम प्रकारचे फर्निचर आणि एवढ्या स्वस्तात मिळत आहे या लालसेपोटी आपण पैसे पाठवायला सुरुवात केली की आणखीन पैसे पाठविल्याशिवाय गाडीची जीपीआरएस सिस्टम सुरू होत नाहीय अशी थाप मारून आपल्याकडून आणखी पैसे उकळले जात असल्याच्या तब्बल दोन घटना उरण तालुक्यात मागील सात महिन्यात घडल्या आहे. यातील एक घटना नोव्हेंबर २०२२ या महिन्यात घडली असून दुसरी घटना नुकतीच जूनच्या १९ तारखेला घडली आहे.
पहिल्या घटनेत फिर्यादीचे ८० हजार भामट्याने उकळले आहेत तर दुसऱ्या घटनेत ४७ हजार उकळले आहेत. या दोन्ही प्रकरणांची पोलिसांच्या सायबर सेलमध्ये नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत सीआरपीएफच्या मित्राच्या नावाने गंडविले गेले आहे तर दुसऱ्या घटनेत उरण पोलीस ठाण्यातील एका जुन्या कर्मचाऱ्याच्या नावाने गंडविले गेले असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईच्या सायबर सेलने यातील दुसऱ्या घटनेतील तक्रारदाराचे पैसे कुठे गेले आहेत याचा शोध घेतला असता ते राजस्थानमधील एका बँक खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे यातील फसल्या गेलेल्या व्यक्ती सोबतची फेसबुक मेसेंजरवरील चॅटिंग ही शुद्ध मराठीमध्ये केली जात असल्याने अशी फसवणूक करणारी टोळी नवी मुंबईत राहून तर अशा लंबाड्यांना अंजाम देत नाहीय ना अशी शंका घेण्याला वाव आहे.
पैसा हा आजच्या जमान्यातला सर्वात महत्वाचा भाग बनला आहे त्या अनुषंगाने चोऱ्या माऱ्या, दरोडे या नेहमीच्याच घटना असतानाच आत्ता केवळ पैसा मिळविण्यासाठी ठगविण्याची नवी युक्ती ठगांनी शोधली आहे. यामध्ये सोशल मीडिया या आजकाल सर्रास वापरल्या जाणाऱ्या आयुधाचा वापर करून ठगविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा ठग लोकांकडून तुमच्या परिचयाच्या व्यक्तीच्या हॅक केलेल्या सोशल मीडियावरील अकाऊंटचा सर्रास वापर केला जात आहे. आपल्या परिचयाची व्यक्तीच आपल्याशी बोलत आहे असा भास झाल्यावर आपण सहज फसले जात असल्याच्या दोन घटना मागील सात महिन्यात एकट्या उरण तालुक्यात घडल्या आहेत. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर असे ठग तुमची भाषा सहज वापरत आहेत. त्यामुळे तुम्हाला संशय यायला वाव राहत नाही. त्याच बरोबर काही अधिकारी वर्गाचे अकाऊंट हॅक करून त्याद्वारे तुम्हाला गंडविले जात आहे. त्यामुळेच कोणत्याही सोशल मीडियावरून चॅटिंगद्वारे केलेल्या व्यवहारातून तुमची फसवणूकच होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. या ठग व्यक्तींकडून बरोबर अधिकारी वर्ग वापरत असलेली भाषा, बोलण्याची लकब, पद्धत आदी वापरली जात असल्याने सुशिक्षित व्यक्ती देखील अशा ठगांच्या भूलथापांना बळी पडत असल्याचे देखील या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे सोशल मिडिया गरजेपुरताच वापरावा हे देखील या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.