कोथिंबीर, टोमॅटो, मिरची महागली: सर्वसामान्यांच्या खिशावर भार
किरण लाड
नागोठणे : राज्यभरात पाऊस सक्रीय होऊन अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. जुन महिना संपता संपता पाऊस सुरु झाला. बळीराजा जरी सुखावला असला तरी भाज्यांचे दर मात्र कडाडले असुन त्याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे.
गेल्या 24 तासात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे.याचा परिणाम भाज्यांवर झाला आहे. बाजारात कोथिंबीरचा दर जुडीला 40 ते 50 रुपये, टोमॅटो प्रति किलो 80 ते 100 दारावर पोहचला आहे. फरसबी, घेवडा, मिरची, मटार या भाज्यांचे दर पाव किलोला 30 ते 40 रुपये झाले आहेत. अचानकपणे भाज्यांचे दर वाढल्यांने सर्वसामान्यांच्या जेवणातुन टोमॅटो, मिरची या भाज्या गायब झालेल्या पाहावयास मिळत आहेत. सद्या बाजारात चढ्या दराने भाज्या विकत घ्याव्या लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अगोदरच वाढत्या महागाईला तोंड देणाऱ्या नागरिकांना पालेभाज्यांच्या वाढलेल्या दरालाही आता तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झालेला दिसत आहे.