• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी पेटणार! आक्रमक ग्रामस्थ आत्मदहनाच्या पावित्र्यात

ByEditor

Mar 5, 2024

आम्हाला कोणतीच चर्चा नकोय, आत्मदहनावर ठाम, तहसीलदारांना ठणकावले

शशिकांत मोरे
धाटाव :
गेली कित्येक महिन्यांपासून सुरू असलेला आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कालव्याची दुरुस्ती, पाणी सोडण्याचे आश्वासन या पलिकडे आजवर प्रशासन गेलेले नाही. पाण्यासाठी विभागीय ग्रामस्थ २०१७ पासून लढत आहेत. आंदोलन, मोर्चा, आमरण उपोषण करण्यात आले. त्यावर तारीख पे तारीख देत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. अनेकदा बैठका झाल्या, पण आज मार्च प्रारंभीही कालव्याची प्रत्यक्ष दुरुस्ती नाही. त्यामुळे कालव्याला पाणी सोडणार कधी? असा सवाल पुन्हा उपस्थित झाला. पाटबंधारे प्रशासन मुख्यतः लोकप्रतिनिधी कालव्याच्या पाण्याबाबत गंभीर नाहीत. अखेर सहनशीलता संपल्याने विभागीय ग्रामस्थ बळीराजा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली प्रचंड आक्रमक झाले आहेत.

कालव्याला पाणी न सोडल्यास १ एप्रिल रोजी पाटबंधारेच्या कोलाड धरणात आत्मदहन करण्याचा गंभीर पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसे निवेदन मंगळवारी ग्रामस्थांनी तहसीलदार रोहा, पाटबंधारेचे उप कार्यकारी अभियंता यांना दिले. त्यामुळे आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न चांगलाच पेटणार हे समोर आले. ग्रामस्थांनी पाण्यासाठी अखेर आत्मदहनाचा मार्ग स्विकारल्याने लोकप्रतिनिधी काय करतात? ग्रामस्थांवर ही वेळ का आली? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.

१ मे २०२३ महाराष्ट्र दिनी तहसील प्रांगणासमोर आमरण उपोषण केले. त्याची दखल विधिमंडळात घेतली गेली. त्यातून कालव्याची दुरुस्ती सुरू झाली. मात्र, दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने २०२३ वर्षांत कालव्याला पाणी आलेच नाही. १६ ऑक्टोबर जागतीक अन्न दिनी बळीराजा फाउंडेशनने पाणी जागर अभियान करत प्रशासनाला सतर्क केले. तरीही मार्च प्रारंभी कालव्याच्या दुरुस्तीला सुरुवात नाही. मग पाणी सोडणार कधी? असा सवाल करत अखेर ग्रामस्थांनी मंगळवारी तहसीलदार किशोर देशमुख, पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता अतुल आगवणे यांना १ एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले. यावेळी बळीराजा फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. दीपक भगत, तुकाराम भगत, अनिल बामुगडे, राजेंद्र जाधव, प्रशांत राऊत, अंतोष शिर्के, रुपेश साळवी, चंद्रकांत शेळके उपस्थित होते.

१ एप्रिल रोजी थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने सबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आम्हा ग्रामस्थांची क्रूर चेष्टा सुरूच ठेवल्याने आम्ही हा अखेरचा पवित्र घेतला. पुढील होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार असाल अशी संतप्त भावना सचिव ॲड. दीपक भगत यांनी व्यक्त केली. आम्हाला कोणतीच चर्चा करायची नाही. पाण्यासाठी आमचे आंदोलने बघा, भूमिका बघा, त्यामुळे आम्हाला आता चर्चा नकोत, प्रशासनाला आमचा बळी हवा असेल तर आम्ही देतो असे ग्रामस्थांनी तहसीलदार यांना ठणकाहून सांगितल्याने प्रशासन आता काय भूमिका घेतो, तत्परता दाखवतो का? हे अधोरेखीत होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!