वैशाली कडू
उरण : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण गेल्या अकरा वर्ष साहित्यिक दिंडीचे आयोजन करत असून यावर्षी देखील रायगड भूषण प्राध्यापक तसेच मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य एल. बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मच्छिंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्यिक आषाढी दिंडीचे आयोजन दिनांक २४ व २५ जून २०२३ रोजी उरण ते पंढरपूर असे करण्यात आले होते.

या साहित्य दिंडीमध्ये एकूण २७ सभासद सहभागी झाले होते. या साहित्य दिंडीची सुरुवात नढाळ येथील पंचतायन मंदिरांपासून करण्यात आली. तेथून पुढे वारी मार्गावर मिळणाऱ्या विविध वाऱ्यांमध्ये सहभागी होऊन वारीचा आनंद सहभागी सर्व साहित्यिक बंधू भगिनी यांना मिळाला. त्यानंतर पंढरपूर या ठिकाणी रात्री कवी संमेलन घेण्यात आले. यामध्ये पाऊस तसेच वारी या विषयांवरती उपस्थित कवींनी आपल्या कविता दिलखुलासपणे सादर केल्या. लांबलेल्या पावसामुळे बळीराजावर आलेले संकट पाहता विठुरायाकडे साकडे घालण्यात आले.
विठुरायाच्या दर्शनानंतर परतीच्या प्रवास सुरू झाला. दिनांक २५ जून २०२३ रोजी हा दिंडी सोहळा समाप्त करण्यात आला. या दिंडी सोहळ्यामध्ये विशेष मेहनत घेऊन सक्रिय सहभाग दाखवणारे मच्छिंद्र म्हात्रे अध्यक्ष कोमसाप उरण, संजय होळकर जिल्हा प्रतिनिधी, राम म्हात्रे खजिनदार, अनंत पाटील, किशोर म्हात्रे, नंदा पाटील, व्रतस्ता तांडेल, अस्मिता म्हात्रे, अर्चना तांडेल, जान्हवी पाटील, वंदना पाटील, प्राजक्ता म्हात्रे, तरंगा पाटील, मेघशाम भगत, एच. के. टेलर, विमल पाटील, प्रफुल्ल तांडेल आदी वारकरी, साहित्यिक सहभागी झाले होते.