• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्हाप्रमुखाने कार्यकर्त्याला शिवी दिल्याने राडा, सुषमा अंधारेंनी सांगितला स्टार्ट टू एंड घटनाक्रम

ByEditor

May 19, 2023

बीड: बीडमधील महाप्रबोधन यात्रा काही तासांवर आली असतानाच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. एवढेच नव्हे तर आपल्यात भांडण झाले तेव्हा मी सुषमा अंधारे यांना दोन कानशिलात ठेवून दिल्याचा दावाही आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटात साहजिकच मोठी खळबळ उडाली होती. मात्र, सुषमा अंधारे यांनी गुरुवारी रात्रीच

ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत एक फेसबुक लाईव्ह करत आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे ठरवले आणि त्यांना तोंडघशी पाडले. तसेच बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या सभास्थळी नेमके काय घडले, याचा सविस्तर घटनाक्रम सुषमा अंधारे यांनी उलगडून सांगितला.

सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले की, माझ्यावर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. पण मी सुखरुप आहे. आम्ही गुरुवारी महाप्रबोधन यात्रा होत असलेल्या माने कॉम्प्लेक्स येथे सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत होते. सभास्थळाची पाहणी झाल्यानंतर मी गाडीत बसून फेसबुक लाईव्ह करत होते.

त्यावेळी बाहेर आप्पासाहेब जाधव एका माणसाला काहीतरी काम सांगत होते. ते त्याला काहीतरी सूचना देत होते. मात्र, त्यांची भाषा उर्मटपणाची आणि एकेरी होती. त्या माणसाला आप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुख असल्याचे माहिती नव्हते. त्याला आप्पासाहेब जाधव यांनी वापरलेली भाषा सहन झाली नाही. तो उलटून आप्पासाहेब जाधव यांना म्हणाला की, तू नीट बोल, मी काही कामगार नाही. त्यावर आप्पासाहेब जाधव यांचा पारा आणखी चढला. मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी नीट बोल, असे म्हणत आप्पासाहेब जाधव यांनी त्या माणसाला शिवी दिली. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. तेव्हा उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर मध्ये पडले. आप्पासाहेब जाधव त्यांच्यावर धावून गेले. हे सगळे भांडण सुरु असल्याचे समजल्यानंतर मी इतर पदाधिकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आप्पासाहेब जाधव आपली गाडी घेऊन पळून गेले होते. यानंतर उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर संतापले. माझा मित्र शेड्युल कास्टचा आहे, मला पोलिसांमध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायची आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला. पण आपली सभा आहे, महाप्रबोधन यात्रा पार पडू दे, त्यानंतर शांतपणे या सगळ्याचा विचार करू, असे सांगत मी वरेकर यांनी समजूत काढल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर मातोश्रीवरुन बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि बीडच्या संपर्कप्रमुखांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता आप्पासाहेब जाधव काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!