तीन महिला गेल्या वाहत; दोन महिला सुदैवाने बचावल्या
गणेश पवार
कर्जत : तालुक्यात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे. तर दिनांक ३० जून रोजी मुसळधार झाल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कर्जत तालुक्यातील आशाणे वाडी येथे घडली आहे. अतिवृष्टीमुळे वाडीजवळील ओढा हा दुथडी भरून वाहत होता. तर हा ओढा पार करताना त्यात तीन महिला वाहून गेल्या. त्यातील दोघी सुदैवाने बाहेर पडल्या मात्र एक ३६ वर्षीय महिला वाहून जात थेट धबधब्यावरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तर सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील माथेरानच्या डोंगर भागात अनेक आदिवासी वाड्या वसल्या आहेत. त्या वाडयांपैकी आशाणे वाडी ही आदिवासी वाडी असून येथील बहुतांश ग्रामस्थ हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. तर येथील वाडीत जाण्यासाठी एक ओढा लागत असून, तो पार करून वाडीत जावे लागते. मात्र आठवडाभर पाऊसाची संततधार सुरू असल्याने व दिनांक ३० जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात पाणी साठले होते. तर अनेक नाले, ओढे भरून वाहत होते. आशाणे वाडीतील लक्ष्मी सखाराम लोती वय ३६ वर्ष ही महिला वाडीतील इतर दोन महिलांसह सायंकाळी परतीची वाट धरत आपल्या घराकडे निघाली होती. परंतू मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे आशाणे वाडी जवळील असलेला ओढा पार करत असताना त्याच्या प्रवाहात त्या तिघी जणी वाहत गेल्या. मात्र त्यातील दोघी जणी सुदैवाने बाहेर पडल्या परंतू लक्ष्मी लोती या महिलेला बाहेर पडता न आल्याने ती पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. हा ओढा पुढे आशाणे धबधबा याला मिळत असल्याने लक्ष्मी लोती थेट नाल्यातून वाहत येऊन धबधब्यातून खाली कोसळली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती ही समजताच कर्जत पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे व पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसह महिलेचा मृतदेहाचा पंचनामा करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शववि्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आशाणे वाडीत असलेल्या ओढयामध्ये यापूर्वी देखील वाहून जाऊन एक मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. तर निवळ रस्ता होण्यासाठी जागेसाठी वन विभागाच्या होणाऱ्या आढमुठी धोरणामुळे अशा अपघातांना आशाणे वाडीतील आदिवासी बांधवाना सामोरे जावे लागत असल्याचे आदिवासी संघटनेकडून बोलले जात आहे. तर असे अपघात रोखण्यासाठी आता अम्हाला आंदोलन करावी लागली तरी आम्ही रस्त्यासाठी आंदोलन करू असे आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मालु निरगुडा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.