• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मतं मिळवण्यासाठी आंबोली -नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट! शेतकरी कामगार पक्षाचा हल्लाबोल

ByEditor

Jul 2, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
४४ कोटी रुपये खर्च करून आंबोली-नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट हा केवळ मते मिळवण्यासाठी आहे. जल जीवन मिशन योजनेच्या योजना नांदगाव ग्रामपंचायत येथे १ कोटी ७२ लाख, मजगाव ग्रामपंचायतमध्ये ४५ लाख रुपये,वडघर पाणी पुरवठा योजना ५० लाख रुपये, उसरोली ग्रामपंचायत ५० लाख रुपये, खारीकवाडा पाणी पुरवठा योजना ५० लाख रुपये, विहूर पाणी पुरवठा योजना ८४ लाख रुपये या सर्व ग्रामपंचायतीना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना जलजीवन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या असताना केवळ मते मिळवण्यासाठी आंबोली -नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट असल्याचा हल्लाबोल मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस अजित कासार व जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, आप्पा वीरकुड, संतोष पाटील, किशोर धामणस्कर, जयंत कासार, प्रमोद मसाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुका चिटणीस अजित कासार यांनी सांगितले की, आंबोली धरणातून ते नांदगाव ग्रामपंचायतीपर्यंत १२ किलोमीटरचे अंतर असून ही योजना खर्चिक आहे. यापेक्षा वांद्रे, खोकरी मजगाव या ठिकाणी धरण बांधल्यास येथील लोकांना मुबलक पाणी मिळणार आहे. धरण बांधण्यासाठी प्रयत्न केले जावेत. मोठे अंतर असल्याने सदरची योजना फेल जाणार आहे. शासनाचे ४४ कोटी रुपये वाया घालवू नये. विद्यमान सत्ताधारी लोकांनी धरण बांधून शेतकऱ्यांना योग्य मोबदला सुद्धा देण्यात यावा अशी मागणी केली. आम्ही महाविकास आघाडीमध्ये असून या पुढील लढा सुद्धा महविकास आघाडीतर्फे लढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी सांगितले की, आंबोली नांदगाव पाणी पुरवठ्यास आमचा विरोध नाही परंतु या धरणातील उपलब्ध जलसाठा हा कमी असल्याने नांदगाव पाणी पुरवठा योजना झाल्यास धरणातील पाण्यात कमालीची घट होऊन पाण्याचा दुष्काळ होणार आहे. पोफळी अथवा वडघर धरण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आली.

यावेळी अजित कासार यांनी सांगितले की, जल जीवन योजना हि ग्रामपंचायत ठराव प्रस्ताव पाठविल्यावर मंजूर होत असते त्यामुळे या योजनेचे कोणीही श्रेय घेऊ नये. मुरुड तालुक्यात तीन हजार कोटींचा विकास केल्याची वल्गना केली आहे. प्रत्यक्ष हि कामे दिसत नाहीत असा टोला लगावला आहे.

निवडणुकीपूर्वी आमदार दळवी यांनी अलिबाग-मुरुड रस्ता स्वतःच्या खर्चाने बनून देण्याचे वक्तव्य केले होते. परंतु, आज त्यांच्या आमदारकीला साडेतीन वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अलिबाग-मुरुड रस्ता पूर्ण करता आलेला नाही. याबाबत गांभीर्यपूर्वक मंथन त्यांनी करणे आवश्यक असल्याचे मत अजित कासार यांनी व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!